मान्यवरांची उपस्थिती : निवृत्त शिक्षकांचा सन्मान : सांगलीचे शाहीर विभुते यांचा पोवाडा-सांस्कृतिक कार्यक्रम
वार्ताहर /नंदगड
आपली संस्कृती प्रकाशपूजक असून अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देते. सूर्य मावळतीनंतर होणारा अंधार हा निसर्गनिर्मित आहे. अज्ञान दाटल्यानंतर होणारा अंधार मानवनिर्मित असतो. अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी हलशी शाळेच्या योगदानाचे आम्ही ऋणी आहोत. कृतज्ञता म्हणून आज शाळेचा 75 वा वर्षपूर्ती अमृतमहोत्सव मराठी ज्ञान संस्कृतीचा कृतज्ञ गौरव सोहळा आहे, असे प्रतिपादन सातारा येथील ज्ये÷ विचारवंत यशवंत पाटणे यांनी केले.
हलशी येथील सरकारी मराठी शाळेचा अमृतमहोत्सव सोहळा रविवारी मोठय़ा उत्साहात पार पडला. प्रमुख वक्ते म्हणून पाटणे बोलत होते. यावेळी पाटणे यांनी माणसाला भाषा आणि संस्कृती या दोन गोष्टी वारसा हक्काने मिळतात. त्यावरच माणूस प्रगतीची शिखरे काबीज करतो. आपल्या मराठी भाषेला ज्ञानोबा-तुकोबांच्या संत साहित्याचा मौल्यवान वारसा लाभला आहे. आपल्या मातृभाषेने अमृताशी पैजा जिंकत मराठी अस्मिता फुलवली आहे. भाषेला विश्वात्मक वैभव प्राप्त करून देण्यासाठी मराठी शाळांनी काळाची पावले ओळखून तंत्रज्ञानाशी नाते जोडून गुणात्मक शिक्षण उपलब्ध करून देण्याबरोबरच शाळांचा दर्जा वाढवला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
शोभायात्रेला वाजत-गाजत सुरुवात
प्रारंभी मारुती मंदिर येथे ग्रा. पं. अध्यक्षा मुनिरा संगोळ्ळी, उपाध्यक्ष संतोष हंजी, प्रदीप पारिपत्येदार, मुख्याध्यापक एल. डी. पाटील यांच्या हस्ते पूजन करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. वाजत-गाजत काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये माजी विद्यार्थी व नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले. महिला कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेची सांगता झाल्यानंतर माजी आमदार दिगंबर पाटील, भाजपा नेते विठ्ठल हलगेकर, ग्रा. पं. अध्यक्षा मुनिरा संगोळ्ळी आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आमदार अंजली निंबाळकर, माजी आमदार दिगंबर पाटील, कोल्हापूर येथील उद्योजक विठ्ठल देसाई आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष सुभाष हट्टीकर होते.
पी. के. चापगावकर यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत गुरव, पीटर डिसोजा, मिलिंद देसाई, महेश्वर देसाई, पांडुरंग काकतकर, अर्जुन देसाई, मोहन पाटील, नारायण जोगण्णावर आदींच्या हस्ते उपस्थितांचा सन्मान करण्यात आला. स्मरणिकेबाबत शिवाजी शिंदे यांनी माहिती दिली. कोल्हापूर येथील उद्योजक विठ्ठल देसाई, आमदार अंजली निंबाळकर, दिगंबर पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. संजीव वाटूपकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पी. जे. घाडी, आबासाहेब दळवी, माजी मुख्याध्यापक ए. आर. देसाई, बी. आर. बुवाजी, प्रकाश पाटील, टी. व्ही. पाटील आदी उपस्थित होते.
दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. रात्री सांगली येथील शाहीर विभुते यांचा पोवाडय़ाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला विविध भागातील माजी विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.