कचरा साचल्याने वाहनधारकांना दुर्गंधीचा त्रास
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात आली आहेत. मात्र शहरातील सांडपाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. पावसाचा जोर वाढला की येडियुराप्पा मार्गावर पावसाचे पाणी साचून कचरा रस्त्यावर पसरतो. परिणामी रहिवाशांसह वाहनधारकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
शहरातील रस्त्यांचा विकास करून दुतर्फा गटारींचे बांधकाम करण्यात आले आहे. पण सांडपाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्याची गरज आहे. मात्र महापालिकेसह प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील सर्व गटारींचे पाणी नाल्याद्वारे तसेच गटारींद्वारे बळ्ळारी नाल्याला जाते. जुने बेळगाव ते बळ्ळारी नाल्यापर्यंतच्या गटारी मोठय़ा आकाराच्या बांधण्यात आल्या आहेत. मात्र या गटारी कचरा आणि मातीच्या गाळाने पूर्णपणे भरल्या आहेत. त्यामुळे गटारीमधून पाणी वाहण्याऐवजी रस्त्यावरून वाहत आहे. परिणामी येडियुराप्पा मार्गावर पाणीच पाणी साचत आहे. गटारीमधून येणारा कचरा रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
सोमवारी दुपारी झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर पाणी साचले होते. पावसाचा जोर वाढला की, रस्ता पाण्याखाली जातो. त्यामुळे ये-जा करणाऱया वाहनधारकांना विशेषतः दुचाकी वाहनचालकांना दुर्गंधीयुक्त पाण्यामधूनच मार्ग काढावा लागतो. येथील दुतर्फा असलेल्या गटारींची स्वच्छता केल्यास या समस्येचे निवारण होऊ शकते. मात्र महापालिका प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. पाच फूट खोली असलेल्या गटारी कचरा आणि गाळाने भरल्या आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना नागरिकांना बसत आहे. पावसाचे पाणी आणि कचरा रस्त्यावर साचल्यानंतर कचरा तसाच राहतो. रस्त्यावर पसरलेल्या कचऱयाची उचल केली जात नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. ये-जा करणाऱया नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाशेजारील गटारींची स्वच्छता करण्यात यावी व पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.