घरात शिरल्याने नागरिकांची गैरसोय
वार्ताहर/सांबरा
मारुतीनगर सांबरा रोड येथे गटारी तुंबल्याने गटारीतील पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर साचले आहे. तसेच गटारीचे पाणी अनेक घरामध्येही शिरले असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम खाते जबाबदारी घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मागील वर्षी येथील रस्त्याचे ऊंदीकरण करण्यात आले होते. वास्तविक पाहता ऊंदीकरणानंतर गटारी बांधणे गरजेचे होते. मात्र नवीन गटारी बांधण्यात आल्या नाहीत. सध्या असलेल्या जुन्या गटारी पूर्णपणे तुंबल्या आहेत. त्यामुळे मारुतीनगर भागातील पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. याबाबत नागरिकांनी महानगरपालिकेला याबाबत विचारले असता हे काम आमचे नसून सार्वजनिक बांधकाम खात्याचे आहे असे सांगत आहेत तर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारीही जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
…तर आंदोलन छेडण्याचा इशारा
गटारीचे पाणी रस्त्यावर तर तुंबले आहेच. शिवाय अनेक घरामध्येही शिरले आहे. त्यामुळे दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी येथील समस्या तातडीने दूर न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.