अरीफ मोहम्मद खान यांच्या कारवर आदळविल्या गाड्या
वृत्तसंस्था / थिरुवनंतपुरम
केरळचे राज्यपाल अरीफ मोहम्मद खान यांच्यावर स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) कडून हल्ला झाल्याची घटना केरळची राजधानी थिरुवनंतपुरम येथे घडली आहे. राज्यपाल खान दिल्लीला जाण्यासाठी थिरुवनंतपुरमच्या विमानतळाकडे आपल्या कारने चालले असताना या संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या दोन कार खान यांच्या कारवर आदळविल्या, असा आरोप आहे. पोलिसांनी सात कार्यकर्त्यांवर गुन्हा सादर केला आहे.
हल्ला झाल्यानंतर अरीफ मोहम्मद खान आपल्या कारमधून बाहेर पडले. त्यांनी गाड्या आदळविणाऱ्या कार्यकर्त्यांना पुढे येऊन जाब विचारला. त्यानंतर हे कार्यकर्ते घटनास्थळावरुन पळून गेले. खान यांच्यासमवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना त्वरित दिली. त्यानंतर पोलिसांनी सात जणांवर गुन्हा सादर केला असून त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
हा मुख्यमंत्र्यांचाच कट !
केरळच्या राज्यपालांवर झालेल्या हल्ल्यात केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा हात आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केला आहे. ज्या राज्यात राज्यपालही सुरक्षित नाहीत, तेथील सर्वसामान्यांची अवस्था काय असेल याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांचे ‘नवकेरळ’ अभियान हे राज्यातील धर्मांध शक्तींचे बळ वाढविणारे आहे. हमाससारख्या दहशतवादी संघटनेच्या हस्तकांचा सुळसुळाट आता या राज्यात वाढू लागला आहे. देशद्रोही शक्तींचे बळ मुख्यमंत्री विजयन वाढवित आहेत, असे आरोप राजीव चंद्रशेखर यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
एसएफआयचे वक्तव्य
एसएफआय संघटनेचे मूळ बंदी घालण्यात आलेल्या सिमी या इस्लामी दहशतवादी संघटनेत आहे. सिमी या संघटनेवर बंदी घालण्यात आल्यानंतर त्याच संघटनेच्या काही हस्तकांनी एसएफआय या गोंडस नावाखाली सिमीसारखेच काम करणारी संघटना स्थापन केल्याचा आरोप आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केरळच्या राज्यपालांचा विरोध चालविला आहे. राज्यपाल केरळमधील विद्यापीठांच्या सिनेटवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांची निवड करीत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा, ते जेथे जातील तेथे निषेध करीत आहोत, असे वक्तव्य त्यांनी केले. मात्र, सोमवारी रात्री राज्यपालांवर झालेल्या हल्ल्याविषयी त्यांनी मौन पाळले आहे.
राज्यात दहशतवाद्यांना आमंत्रण
केरळचे डाव्या आघाडीचे सरकार राज्यात इस्लामी दशहतवाद्यांना आमंत्रण देत आहे, असा आरोपही भाजपकडून करण्यात आला आहे. हे सरकार निवडून आल्यापासून राज्यात दहशतवादी घटनांमध्ये आणि हिंसाचारामध्ये वाढ झाली आहे. गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. दहशतवाद्यांसंबंधी हे सरकार बोटचेपी भूमिका घेत आहे. त्यांना रोखण्यासाठी पोलिसही पुढे येत नाहीत, कारण पोलीस यंत्रणा प्रभावहीन करण्यात आली आहे, असाही भाजपचा आरोप आहे.