ऑनलाईन टीम/तरुण भारत
सोलापूर: राजेंचे काय होणार? राजे काय करणार आहेत? राजे माघार घेणार की काय असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र या सगळ्यामुळे आमच्या घरात तणावाचे वातावरण नाही.राजकारणाचे टेंशन रोजच्या जीवनात आणणे हे मला पटत नाही. काल रात्रीदेखील मी आणि आई ( संभाजीराजे यांची पत्नी) घरात काय साहित्य खरेदी करावे यावर चर्चा करत होतो. आम्ही कोणत्याही प्रकारच्या तणावात नाही. आमचे रुटीन लाईफ सुरू आहे. मात्र या सगळ्या घडामोडीवरुन असे लक्षात येतय की संभाजीराजेंबद्दल जनतेच्या मनात किती प्रेम आहे. अशी भावना छत्रपती शहाजीराजें (ShahajiRaje) यांनी व्यक्त केली. यावेळी संभाजी महाराजांच्या मागे एवढ्या संघटना का आहेत? असा सवाल करत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला. आज त्यांनी सोलापुरात (Solapur) माध्यमांशी संवाद साधला.
संभाजीराजे (Sambhajiraje) अपक्ष लढणार यावर ठाम आहेत याविषयी बोलताना शहाजीराजें म्हणाले, राजेंनी आता लढायचे ठरवले आहे. ते लढणारचं आहेत. उद्या ते आपली भूमिका मांडतील. मात्र सध्या सुरु असलेल्या घडामोडींमुळे माझ्या आजूबाजूचे लोक टेंशनमध्ये आहेत. पण राजेंच्या पाठिशी सर्व जनता उभी आहे याचे मला समाधान आहे. आजच्या भाषणात मी जरी राजकीय बोललो नसलो तरी. आमच्यावर झालेल्या टिकेल करेक्ट करण ही माझी आत्मजबाबदारी आहे. आम्ही जरी खूष नसलो तरी लोकांसाठी काम करणार आहोत. यावेळी त्यांनी राजकीय घडामोडीबाबत बोलण्यास थेट नकार दिला.
मावळे असतात म्हणून राजे असतात असे संजय राऊत म्हणाले होते. यावर बोलताना ते म्हणाले, संजय राऊत बोलले त्यात काही चुकीचे नाही. शिवाजी महाराजांना ताकद मावळ्यांनी दिली. आणि मावळ्यांना घडवण्याचे काम महाराजांनी केले. शिवाजी महाराजांच्या विचाराने, हुशारीने मावळे घडले. आज संभाजी महाराजांच्या मागे एवढ्या संघटना का आहेत? असा सवाल त्यांनी यावेळी केला. पुढे बोलताना ते म्हणाले, संभाजीमहाराजांनी मावळ्यांना एक दिशा दिली आणि मावळ्यांनी राजेंना ताकद दिली. हे एक आपुलकीचे नातं आहे. जे चांगल्या घरासारखे एक कुटुंब आहे. या नात्याची काळजी घ्यावी लागते असेही ते म्हणाले.