डॉ. एम. आर. निंबाळकर यांचे प्रतिपादन : स्मृती शताब्दीनिमित्त कृतज्ञता पर्व : आरपीडी महाविद्यालयात कार्यक्रम
प्रतिनिधी / बेळगाव
शाहू महाराजांनी जातिभेद नष्ट करून प्राथमिक शिक्षणाची सोय केली. याबरोबरच दलित आणि मागासवर्गीय समाजासाठी सातत्याने प्रयत्न केले. कोल्हापूरच्या ऐतिहासिक नगरीत शाहू महाराजांचे कार्य उत्तम राहिले आहे. त्यामुळे त्यांना खरे लोकशाहीवादी आणि समाज सुधारक मानले जाते, असे विचार डिफेन्स कॉलेज दिल्लीचे निवृत्त प्राचार्य डॉ. एम. आर. निंबाळकर यांनी मांडले.
एसकेई सोसायटी संचालित राणी पार्वतीदेवी कला आणि वाणिज्य महाविद्यालय बेळगाव, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजषी शाहू महाराज स्मृती शताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता पर्व कार्यक्रमात ते ‘राजषी शाहू यांची शैक्षणिक आणि सामाजिक कामगिरी’ या विषयावर बोलत होते. आरपीडी महाविद्यालयाच्या के. एम. गिरी सभागृहात हा कार्यक्रम झाला.
व्यासपीठावर एसकेई सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर, प्राचार्या डॉ. शोभा नाईक उपस्थित होत्या. प्रारंभी वैष्णवी काकतीकर यांनी स्वागतगीत सादर केले. प्राचार्या डॉ. शोभा नाईक यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. डॉ. अभय पाटील यांनी ओळख करून दिली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराज प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन झाले. यावेळी प्रा. अजय हिरेमठ, अंजली देशपांडे यांनी राजर्षि शाहू महाराजांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले. डॉ. एम. आर. निंबाळकर पुढे म्हणाले, कोल्हापूर संस्थानकाळात शाहू महाराजांनी जातिभेद उखडून काढण्याबरोबर आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली. शिवाय जातीवाद आणि अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. याबरोबरच सर्व धर्मांसाठी वेगवेगळी वसतिगृहे सुरू करून गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली. त्यामुळे अनेक विद्यार्थी घडले, असे सांगितले. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. पी. डी. गावडे यांनी केले.