प्रा. डॉ. रमेश जाधव यांचे प्रतिपादन ; शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ज्योती महाविद्यालयात व्याख्यान
प्रतिनिधी /बेळगाव
राजर्षी शाहू महाराजांनी सुमारे 28 वर्षे राज्यकारभार केला. शाहू महाराजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना 1 रु. दंड आकारण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करून स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी कार्य केले असल्याची माहिती प्रा. डॉ. रमेश जाधव यांनी दिली.
द.म.शि. मंडळ आणि शाहू महाराज प्रकाशन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राजषी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ज्योती महाविद्यालयात रविवारी प्रा. डॉ. रमेश जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. म. फुले आणि शाहू महाराजांची शैक्षणिक चळवळ या विषयावर डॉ. रमेश जाधव बोलत होते.
द.म.शि. मंडळाचे उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी प्रथम शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव विक्रम पाटील यांनी केले.
यावेळी डॉ. रमेश जाधव म्हणाले, अस्पृश्यता नष्ट करण्याच्यादृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळय़ा शाळा भरविण्याची प्रथा 1919 मध्ये बंद केली. प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शाहू महाराजांनी शाळा सुरू केल्या, असेही त्यांनी सांगितले.
उपेक्षित समाजाला दिला न्याय
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालविणारा राजा म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा व आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये अद्वितीय स्वरुपाचे कार्य केले. स्वातंत्र्याच्या अनेक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता या सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अंमलात आणली. रयत, प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहू महाराजांनी केले. आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला, म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले. त्यांच्या कार्याचा गौरव समकालीन लेखकांनी व इतिहासकारांनी केला असल्याचे प्रा. डॉ. रमेश जाधव यांनी नमूद केले.
याप्रसंगी दीपक देसाई, एन. बी. खांडेकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, प्राध्यापक, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
अस्पृश्यांना समानतेने वागवण्याचा दिला आदेश
त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱया मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे, असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला होता. अशी विविध माहिती आणि राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा प्रा. डॉ. रमेश जाधव यांनी घेतला.