निविदा प्रक्रिया, वर्कऑर्डर प्रक्रियेला लागणार अवधी
प्रशासकीय मान्यता मिळूनही निधीसाठी पाच महिने वेटिंग
कोल्हापूर/विनोद सावंत
नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधी स्थळाचा दुसऱया टप्प्यातील 9 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळून पाच महिने झाले तरी महापालिकेकडे निधी वर्ग झालेला नाही. प्रशासकीय मान्यतेच्या आधारे मनपाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास आणि निधी मिळण्यास किमान दीड महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने शाहू समाधी स्थळाचे दुसऱया टप्प्यातील कामांना सुरुवात आता पुढील वर्षीच होईल, असे चिन्ह आहे.
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी हयात असतानाच आपली समाधी सिद्धार्थनगर, नर्सरी बाग येथे करावी, असे म्हटल्याची नोंद आहे. त्यांची इच्छा आणि शाहूप्रेमी जनतेच्या मागणीचा विचार करून महापालिकेने 2 कोटी 80 लाखांच्या स्वनिधीतून राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचे समाधी स्मारकस्थळ नर्सरी बागेत उभारले. दुसऱया टप्प्यातील कामांसाठी 9 कोटींच्या निधीची आवश्यकता होती. मनपाची सध्याची आर्थिक स्थितीचा विचार केला तर हे शक्य नाही. त्यामुळे राज्य शासनाकडे निधीची मागणी केली. युती सरकारमध्ये हे शक्य झाले नाही. मात्र, महाविकास आघाडीमध्ये तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी या निधीसाठी पाठपुरावा केल्याने 9 कोटी 40 लाख 56 हजार 109 रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली. याला पाच महिने झाले तरी निधी महापालिकेकडे वर्ग झालेला नाही.
दरम्यान, मनपाने निविदा प्रक्रिया सुरू केली असून कामांची फाईल मुख्य लेखापरिक्षकांकडे आहे. यानंतर अतिरिक्त आयुक्त, प्रशासकांची मंजुरी घेऊन टेंडर काढले जाणार आहे. 21 दिवसाचा यासाठी कालावधी लागणार असून त्यानंतर वर्कऑर्डर दिल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. या सर्व प्रक्रियेस नवीन वर्ष उघडणार यात शंका नाही.
स्थगिती नाही तर मग निधी देत का नाही?
शिवसेनेतील एकनाथ शिंदे गट आणि भाजपचे पाच महिन्यांपूर्वी राज्यात सत्ता आली. त्यांनी महाविकास आघाडीने अंतिम टप्प्यात घेतलेले काही निर्णय रद्द केले. यामध्ये शाहू समाधीस्थळासाठी मंजूर झालेला निधीचा समावेश नसल्याचे शासन स्तरावरून सांगितले जाते. मग सात महिने झाले तरी महापालिकेकडे निधी वर्ग का होत नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
समाधीस्थळी नतमस्तक, निधी देण्यास चालढकलपण
मनपाने जानेवारी 2020 मध्ये शाहू समाधी स्थळाचे लोकार्पण झाले. मनपा प्रशासनाने राज्य शानाने दुसऱया टप्प्यातील निधीची मागणीही केली. दोन वर्ष झाले तरी निधी मिळालेला नाही. एकीकडे राज्य पातळीवरील नेते कोल्हापुरात आल्यानंतर शाहू समाधीस्थळी नतमस्तक होतात. मात्र, त्यांच्याकडून दुसऱया टप्प्यातील निधीसाठी चालढकलपणा केला जात आहे.
शाहूंच्या कामात तरी श्रेयवाद नको
थेटपाईपलाईन, टोल माफी, अमृत योजनेच्या निधीवरून श्रेयवादाचे राजकारण रंगले. शाहू समाधी स्थळाच्या दुसऱया टप्प्यातील निधी श्रेयवादाच्या राजकारणात अडकू नये. तातडीने दुसऱया टप्प्यातील निधी मनपाकडे वर्ग होणे अपेक्षित आहे.
स्मृती शताब्दीमध्येच समाधीस्थळाची विसर
महाविकास आघाडी सरकारने शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम घेतले. वास्तविक 6 मे 2022 रोजी राजर्षी शाहू महाराज यांची 100 व्या पुण्यतिथीवेळी तरी समाधीस्थळाच्या दुसऱया टप्प्यातील कामांना सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र, लालफितीच्या कारभारामुळे हे शक्य झाले नाही.
दुसऱ्या टप्प्यातील 9 कोटींतून होणारी कामे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल नूतनीकरण.
डॉ. आंबेडकर हॉलमध्ये शाहूंच्या जीवनावर डॉक्युमेंटरी दाखविण्याची सुविधा.
दलितमित्र दादासाहेब शिर्के उद्यानात कंपाऊंड वॉल, लॅन्डस्केपिंग.
पार्किंग सुविधा तसेच स्वच्छतागृहाची बांधणी.
परिसरातील सात राज घराण्यातील समाधी, दुरुस्तीसह नूतनीकरण