पहाटे काढलेल्या महारथ मिरवणुकीला भाविकांची अलोट गर्दी, पाच दिवस झाले विविध धार्मिक कार्यक्रम
प्रतिनिधी /कुंकळ्ळी
फातर्पा येथील प्रसिद्ध श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानचा वार्षिक जत्रोत्सवाची रविवार 1 रोजी पहाटे महारथ मिरवणूक, आरती, प्रसाद होऊन सांगता झाली. महारथाच्या मिरवणुकीवेळी भाविकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. यंदा 27 डिसेंबरपासून जत्रोत्सवाला सुरुवात होऊन 1 पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम झाले. महाजन, कुळावी व भक्तांनी या कालावधीत सहकुटुंब व मित्रमंडळीसह उपस्थित राहून श्रींच्या या उत्सवाचा व कृपाशीर्वादाचा लाभ घेतला.
जत्रोत्सवात मंगळवार 27 डिसेंबर रोजी सकाळी श्रींस महाभिषेक, रात्री विधिपूर्वक नमन, शिबिकोत्सव, जागर, आरती, प्रसाद, बुधवार 28 रोजी सकाळी श्रींस महाभिषेक, रात्री शिबिकोत्सव व नंतर श्रींची अंबारी रथातून मिरवणूक, आरती, प्रसाद, गुरुवार 29 रोजी सकाळी श्रींस महाभिषेक, कुंकुमार्चन, रात्री जागर, शिबिकोत्सव, नंतर श्रींची फुलांच्या रथातून मिरवणूक, आरती, प्रसाद व ऑर्केस्ट्रा, शुक्रवार 30 रोजी सकाळी श्रींस महाभिषेक, रात्री श्रींची विजयरथातून मिरवणूक, आरती, प्रसाद, तर शनिवार 31 रोजी सकाळी श्रींस महाभिषेक, रात्री जागर, शिबिकोत्सव असे कार्यक्रम झाले.
मंदिराच्या नव्या समितीच्या अधिपत्याखाली होणारी ही पहिलीच जत्रा असल्याने समितीने हा उत्सव यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी केली होती. संस्थानचे नवे अध्यक्ष कवेंद्र नाईक देसाई, सचिव विराज देसाई, खजिनदार दर्शन देसाई, मुखत्यार सुभाष देसाई यांनी त्यासाठी परिश्रम घेतले. नवसाला पावणारे भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून या देवीची ख्याती दूरवर पसरलेली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये तसेच शेजारील राज्यांत देवीचे भक्तगण विखुरलेले असून वार्षिक उत्सवाच्या वेळी आपला नवस फेडण्यासाठी ते हमखास हजेरी लावत असतात. राज्यातील हजारो भाविकांबरोबर खास करून कर्नाटकच्या कारवार जिल्हय़ातील तसेच महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्हय़ातील भाविकांनीही जत्रोत्सवात उपस्थिती लावली.
यानिमित्ताने मोठी फेरी भरत असल्याने व्यापारी वर्गासाठी ही जत्रा एक पर्वणीच असते. यात शेजारील राज्यांतील व्यापारीही असतात. यंदा मोठय़ा प्रमाणात दुकाने थाटण्यात येऊन जत्रोत्सवाची सध्या सांगता झालेली असली, तरी बहुतांश फेरी आणखी दहा-बारा दिवस येथे राहणार आहे. देवस्थान समितीने भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतल्याने भाविकांची उत्तम सोय झाली. याकामी मदत केलेले सार्वजनिक बांधकाम खाते, पोलीस, वीजखाते, अग्निशामक दल यांचे समितीने आभार मानले आहेत. दरम्यान, श्रींस अर्पण केलेले सोन्याचे दागिने, कपडे व इतर मौल्यवान वस्तूंचा लिलाव आज सोमवार 2 जानेवारी ते शुक्रवार 6 जानेवारीपर्यंत पुकारण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष कवेंद्र नाईक देसाई यांनी दिली आहे.