शहरी नक्षलवाद्यांना अटक करा, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडणार
सांगली/प्रतिनिधी
भिमा-कोरेगाव दंगल प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमधून संभाजी भिडे गुरुजींचे नाव वगळण्यात आले आहे. आता दंगल घडविण्याचे कारस्थान करणाऱ्या शहरी नक्षलवाद्यांना अटक करून तुरुंगात टाकावे, यासाठी राज्यभर आंदोलन छेडणार आहोत. तसेच या प्रकरणी गुरूजींचे नाव घेऊन बदनामी करत दलित समाजाची दिशाभूल करणारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी पत्रकार बैठकीत केली.
चौगुले म्हणाले, भिमा कोरेगाव प्रकरणी नाव आल्यानंतर संभाजी भिडे गुरुजी यांना सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रथम पाठींबा दिला. त्याच्यानंतर अॅड. प्रदीप गावडे तुषार दामगुडे, डॉ. स्मिता पाटील विवेक विचार मंचचे सर्व पदाधिकारी, सागर शिंदे या सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. तर आम्ही 28 मार्च 2018 रोजी भिडे गुरुजी सन्मान मोर्चा काढला होता. यावेळी राज्यातील अनेक हिंदुत्ववादी संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल विश्व हिंदू परिषद, सनातन प्रभात यांच्यासह दलित चळवळीमध्ये काम करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील २३ संघटनांनी पाठिंबा दिला. नुकतेच भिडे गुरुजी निर्दोष असल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्यात तेढ निर्माण करण्यासाठी मोठे षडयंत्र होतं ते पूर्णपणे उध्वस्त झाले. दि 11 जानेवारी 2018 नंतर प्रकाश आंबेडकर आणि या महाराष्ट्रातील खूप मोठे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भिडे गुरुजींवर आरोप केले. पवार यांनी तर संपूर्ण हिंदू संघटनांना बदनाम करत या संघटनांनीच दंगल घडवली, असे माध्यमांसमोर वक्तव्य केले. भिडे गुरुजींनी त्या परिसरात बैठका घेऊन वातावरण निर्माण केल्याचे मत मांडले. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या लेखी जबाबात गुरुजींचा उल्लेख नाही. शरद पवार यांनीही प्रतिज्ञापत्रात गुरूजींचा उल्लेख केला नाही. ज्यांनी तक्रार केली त्यांनी मला माहिती नाही, मी कोणाला ओळखत नाही, असं सांगितलं.
भविष्यात अशा दंगली होऊ नये म्हणून देशातील शहरी नक्षलवाद हा मोडीत काढला पाहिजे. जबाबदार राजकीय नेतृत्वांनी असे बेजबाबदार वक्तव्य करणं टाळलं पाहिजे. पुणे पोलिसांनी आजवर 20 शहरी नक्षलवाद्यांना जेलमध्ये खितपत ठेवले आहे. एवढ्यावर लढाई संपत नाही. तर दंगल घडविण्याचे कारस्थान करणाऱ्यापर्यंत तपास पोहोचला पाहिजे, अशी मागणी केंद्राचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहोत.
कबीर कला मंचच्या हर्षाली पोतदार यांचे नक्षलवाद्यांशी संबंधित पुरावे सापडले असतानाही त्यांना अटक नाही. तसेच एल्गार परिषदेच्या आयोजकांना अजूनही अटक झालेली नाही. त्यांना अटक करावी तसेच सूत्रधारांवर कारवाई व्हावी. या मागणीसाठी आम्ही पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडणार आहोत.