ऑनलाईन टीम / मुंबई :
राणा दाम्पत्याच्या हनुमान चालीसा पठणाच्या हट्टामुळे घडलेल्या नाटय़ानंतर भाजप आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोहचला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आल्याचे सांगून भाजप नेत्यांकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा केली जात आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी भाष्य केले आहे. काही लोकांनी निवडणुकीपूर्वीच मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार अशा घोषणा दिल्या होत्या. आता ते लोक अस्वस्थ आहेत. सगळेच लोक माझ्यासारखे नसतात. 1980 साली माझी सत्ता गेल्याचे मुख्य सचिवांनी मला रात्री 12.30 ला सांगितले. तेव्हा मी घर आवरुन मॅच पाहायला वानखेडेवर गेलो, अशा शब्दात पवार यांनी देवेंद्र फडणवीस (devendra phadanvis) यांना चिमटा काढला.
पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, सत्ता गेल्यानतंर लोक अस्वस्थ होतात. सगळेच माझ्यासारखे नसतात. 1980 मध्ये पुलोद सरकार होतं. हे सरकार बर्खास्त करण्यात आल्याची माहिती रात्री 12.30 वाजता मुख्य सचिवांनी मला दिली. त्यानंतर तीन चार मित्रांना बोलावलं आणि घरातल सामान आवरलं. सकाळी 7 वाजता दुसऱ्या जागेत राहायला गेलो, सरकारी गाडी सोडली. त्यादिवशी इंग्लंड आणि भारताचा सामना होता. 10 वाजता वानखेडेवर सामना पाहण्यासाठी गेलो आणि दिवसभर सामन्याचा आनंद लुटला. सत्ता येते आणि जाते पण त्यामुळे अस्वस्थ होण्याचं कारण नाही.
हनुमान चालीसा पठणाबद्दल बोलताना ते म्हणाले, धार्मिक भावना प्रत्येकाने स्वत:पर्यंत मर्यादित ठेवाव्यात. धर्माबद्दलच्या भावनांचं प्रदर्शन नको. मशिदीवरील भोंग्यांच्या प्रश्वावरून तोडगा काढण्यासाठी ठाकरे सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.