ऑनलाईन टीम/तरुण भारत
अनेक नाट्यमय घडामोडीनंतर मध्यरात्री झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या (rajya sabha election) मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (sanjay pawar) यांचा पराभव झाला आहे. तर भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. त्यामुळे भाजपाचे तीन सदस्य राज्यसभेवर निवडून गेले असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. सहाव्या जागेच्या विजयासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) प्रयत्न करत होते. त्यामुळे शिवसेनेसाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निकालाबाबत भाष्य केले आहे. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
“मला स्वतःला धक्का बसेल असा हा निकाल नाही. प्रत्येक उमेदवाराच्या मतांची संख्या बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या कोट्यामध्ये काही फरक पडलेला नाही. पण एक मत प्रफुल्ल पटेल यांना जादा पडले आहे आणि ते कुठून आले आहे.ते मला ठाऊक आहे. ते महाविकास आघाडीचे नाही, तर ते दुसऱ्या बाजूच आहे.” असे शरद पवार म्हणाले.
पुढे बोलताना पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गांनी माणसे आपलीशी करण्यात यश आल्याचं म्हणत त्यांनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे. आज सकाळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी पवारांची पुण्यात भेट घेतली. यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्रातील राज्यसभेसाठीच्या सहा जागांसाठी काल मतदान पार पडले. यामध्ये महाविकास आघाडी सरकरामधील शिवसेने नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी विजयी झाली आहे. तर भाजपच्या पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक या तीन उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. दरम्यान सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने ऐनवेळी धनंजय महाडिक हा सात उमेदवार रिंगणात उतरवला. यामुळे शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेला उमेदवार संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सहाव्या जागेच्या विजयासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार प्रयत्न करत होते. त्यामुळे शिवसेनेसाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे. राज्यसभेच्या या निकालानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिला.