कोल्हापूर:राहुल गडकर
एकीकडे संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर करून आपली भूमिका स्पष्ट करून सांगणारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राज्यसभेचा महाविकास आघाडीच्या पाठिंब्याचा चेंडू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ढकलला. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेतुन राज्यसभा लढवावी अशी अट घालून संभाजीराजेंच्या पुढील राजकीय समिकरणावर अक्षरशः मुख्यमंत्र्यांनी पाणी ओतले. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे संभाजीराजे छत्रपती यांची कोंडी झाली आहे. मात्र गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा शब्दही न मोडणारी शिवसेना ही त्यांच्या विरोधात जाऊन भूमिका घेते. यावरूनच या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. खासदार संजय राऊत आणि शरद पवार यांची संभाजीराजे यांच्याबद्दल भूमिका पाहता त्यांना कोंडीत पकडण्याचा डाव शरद पवार आखतायेत की काय? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. तर पवार व ठाकरे यांच्या परस्पर भूमिकेमुळे संभाजीराजे यांचे स्वतंत्र अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे की काय? अशी चर्चा रंगू लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस संभाजीराजेंना राज्यसभेच्या जागेसाठी पाठिंबा देईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले असले तरी अंतिम निर्णय महाविकास आघाडी म्हणून घेतला जाईल, त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर गुरुवारी संभाजीराजे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सुद्धा संभाजीराजेंना शिवसेना पाठिंबा देणार की नाही, हे दोन्ही बाजूंकडून अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र संभाजीराजे यांनी शिवसेनेतून निवडणूक लढवावी अशी अट मुख्यमंत्री ठाकरे यांना घातली असल्याची माहिती सूत्रांकडून आली आहे. राज्यसभेचा सहावा उमेदवार शिवसेनेचाच असेल, अशी भूमिका राज्यसभा खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी ठासून मांडली आहे. संभाजीराजे शिवसेनेत आले तरच त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, अशी शिवसेनेची भूमिका आहे.
संभाजीराजेंना पक्षीय चौकटीत बांधण्याचा डाव
भाजपने राष्ट्रपती कोट्यातून संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर नेले असले तरी त्यांनी पक्षवाढीसाठी काम केले नाही. शिवाय कधी कधी केंद्रावर बोट ठेवत त्यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजपमध्ये देखील त्यांच्याबद्दल नाराजी आहे. तर येणारी राज्यसभा अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर संभाजीराजेचे स्वतंत्र अस्तित्व ठेवणे हे भविष्यात शिवसेनेला, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला देखील महागात पडू शकते. त्यामुळे पक्षाच्या चौकटीत बसवून त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा डाव पवारांचा आहे की काय? असा सवाल देखील आहे.
भविष्यात स्वराज्य संघटनेचा राष्ट्रवादीला फटका
प्रामुख्याने राष्ट्रवादीकडे मराठा मतदार अधिक आहे. तर संभाजीराजे छत्रपती यांच्याकडेदेखील मराठा मतदारांची संख्या अधिक आहे. पुण्यात संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेची घोषणा केल्यानंतर किंवा स्वतंत्रपणे राजकीय पटलावर येत असल्याने त्याचा फटका राष्ट्रवादीला बसू शकतो. संभाजीराजे याना राष्ट्रवादी थेट मैदानातून विरोध करणार नसल्याने गनिमी कावा वापरून संभाजीराजे याना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पवार-ठाकरेंची भूमिका आणि राऊतांचे विधान
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी संभाजीराजे याना पक्षाचा पाठिंबा जाहीर करून त्यांना आपल्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. अपक्ष असताना देखील त्यांना पाठिंबा देणे ही पवारांची राजकीय खेळी म्हणावी लागेल. पब पवारांनी महाविकास आघाडी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भूमिका घेतली असे सांगितल्यानंतर पवार यांच्या पाठिंबाच्या अर्थ राजकीय जाणकारांना लक्षात येतो. तर राज्यसभेसाठी शिवसेना सहावा उमेदवार देणार असं जाहीर केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संभाजीराजेनी शिवसेनेतुन निवडणूक लढवावी अशी अट घालण्यात आली. तर खासदार राऊत यांनी आम्हाला छत्रपतींचा आदर आहे. पण राजकारण वेगळे आहे. संभाजीराजे यांनी ४२ मते कुठून गोळा केली. असे विधान राऊत यांनी केले. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून पवार यांचे ऐकणारी शिवसेनेने आता भूमिका का बदलली? हे देखील तितकेच महत्वाचे आहे.
सेनेला काय फायदा होईल?
छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत गेले तर छत्रपतींचा वंशज अधिकृतरित्या शिवसेनेत असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे बळ वाढेल. मराठा समाजाचा लाभ सेनेला होईल. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची जवळीकता पाहता त्याचा थेट फायदा राष्ट्रवादीला देखील होऊ शकतो.