पुत्र-कन्येने दिला मुखाग्नी, मान्यवर नेत्यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित
आंखमऊ / वृत्तसंस्था
थोर समाजवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांच्या पार्थिवावर येथे अत्यसंस्कार करण्यात आला आहे. शुक्रवारी एका खासगी रुग्णालयात वयाच्या 75 व्या वर्षी त्यांचा देहांत झाला होता. मध्यप्रदेशातील नर्मदापूर जिल्हय़ाच्या आंखमऊ या त्यांच्या जन्मगावी अत्यसंस्कार पार पडले. त्यांना त्यांचे पुत्र शांतनू आणि कन्या शुभांगिनी यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
शनिवारी सकाळी एका विशेष विमानातून त्यांचे पार्थिव नवी दिल्ली येथून मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे आणण्यात आले. तेथे राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा, राज्याचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग आणि इतर नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली दिली. त्यानंतर दुपारी साधारण तीन वाजता त्यांचे पार्थिव आंखमऊ येथे नेण्यात आले. तेथे त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.
मान्यवरांच्या प्रतिक्रिया
शरद यादव हे नैतिकता आचरणारे राजकारणी होते. ते अचानक गेल्याने देशाची मोठी हानी झाली आहे. ते माझे एकप्रकारे शेजारीच होते. माझे मूळ गाव नर्मदेच्या एका तटावर, तर त्यांचे गाव विरुद्ध बाजूच्या तटावर होते. बालपणापासूनच शरद यादव प्रखर लढवय्या होते. आयुष्यभर त्यांनी अन्यायाविरोधात संघर्ष केला आहे. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाचे ते प्रमुख स्तंभ होते, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया मुख्यमंत्री चौहान यांनी व्यक्त केली.
मंडल राजकारणाचे आधारस्तंभ
अन्य मागासवर्गियांना सरकारी नोकऱया आणि शिक्षणात आरक्षण देण्याची सूचना केलेल्या मंडल आयोगाचे क्रियान्वयन करणात महत्वाची भूमिका त्यांनी साकारली होती. दलित, मागास आणि शोषित वर्गाच्या हितासाठी त्यांनी आपले अवघे आयुष्य व्यतीत केले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू केली होती. या आणीबाणीच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांनी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. शरद यादव नारायण यांच्या नजीकचे होते अशी प्रतिक्रिया अनेक नेत्यांनी आणि शरद यादव यांच्या सहकाऱयांनी दिली.
निष्यक्षपाती नेता
जे चुकीचे असेल त्याचा विरोध करणे हे शरद यादव यांचे वैशिष्टय़ होते. त्यांनी कोणाशीही विनाकारण शत्रुत्व पत्करले नाही. सर्वसमावेषक पद्धतीने त्यांनी त्यांचे राजकारण केले. भारताच्या राजकारणात 1080 ते 1990 हे दशक अतिशय महत्वाचे आणि देशाच्या राजकारणाची दिशा परिवर्तीत करणारे ठरले आहे. त्यावेळी विविध आंदोलनांमध्ये भाग घेऊन शरद यादव यांनी देशव्यापी छाप पाडली होती.
वाजपेयींशी विशेष संबंध
भाजप नेते आणि दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी यादव यांचे जवळचे संबंध होते. लालू प्रसाद यादव यांचा हात सोडून नितीशकुमार हे नेते भाजपच्या जवळ आले. शरद यादव यांनीही त्यांचे समर्थन केले. शरद यादव काही काळ केंद्रात मंत्री होते. युती कोणाशीही असो शरद यादव नेहमीच परखड आणि सत्यप्रिय राहिले. तत्वाशी तडजोड त्यांनी कधी केली नाही. आपला लौकिक त्यांनी नेहमीच राखला, अशीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
ड शरद यादव यांना असंख्य कार्यकर्त्यांचा साश्रू नयनांनी निरोप
ड अंत्यसंस्कार साधेपणाने, त्यांच्या मृत्यूने देशाची अपरिमित हानी
ड तत्वाशी कधीही तडजोड न करणारे नेते म्हणून यादवांची प्रसिद्धी
ड शुक्रवारी दिल्लीनजीकच्या एका खासगी रुग्णालयात झाले निधन