ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेना (shivsena), राष्ट्रवादी (ncp) आणि काँग्रेस (congress) अशी राज्यात आघाडी आहे. गेली अडीच वर्षे झाले महाविकास आघाडी सरकार संकटांना सामोरे जात सरकार चालविण्याचा प्रयत्न करत आहे. तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये काहींना काही कारणावरून मतभेद असूनही हे सरकार स्थिर आहे. अनेकवेळा शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये राज्यातील अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर खटके उडत असल्याचं चित्र दिसत आहे. अगदी मुंबईच्या शेजरी असणाऱ्या ठाण्यामध्येही स्थानिक राजकारणात हे पक्ष परस्परविरोधी वक्तव्य करताना दिसत आहेत. मात्र काँग्रेसच्या नेत्या आणि महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकुर (yashomati thakur) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. पवारसाहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं. पवार साहेब ही काळाची गरज आहे, असं यशोमती ठाकुर म्हणाल्या. शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची ५७ वी पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली कार्यक्रम रविवारी अमरावतीत पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
शरद पवार हे रविवारी अमरावती दौऱ्यावर होते. अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात (panjabrao deshmukh medical college) शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावर व सभागृहाचे लोकार्पण होणार होते. या कार्यक्रमासाठी पवार अमरावतीला आले होते. तसेच या कार्यक्रमाला शरद पवारांबरोबरच महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूरांसहीत इतर नेतेही उपस्थित होते, या कार्यक्रमात मंत्री यशोमती ठाकूर यांनी बोलतांना मुख्यमंत्री पदाबाबद मोठं वक्तव्य केलं.
यशोमती ठाकुर म्हणाल्या,”साहेब एवढा भयाण हल्ला झाला. प्रत्येकजण मला विचारत होते येणार आहेत का साहेब….पण साहेब तुम्ही आलात, तुमच्या हिमतीची दादच दिली पाहिजे. तुम्ही थकत कसे नाही. आमच्यापेक्षा चारपट वयाचे तुम्ही आहात आणि तुम्ही थाबंत कसे नाही. कौतुकच वाटतं. प्रत्येक गोष्ट तुमच्याकडून शिकण्यासारखी आहे, प्रत्येक गोष्ट तुम्ही जी जी करता, ती ती अंगी वळणी पाडण्यासारखी आहे. साहेब आपण जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात…तर महाराष्ट्राचं चित्र अजून काही राहिलं असतं. चार वेळा साहेब मुख्यमंत्री होते. पण आज काळाची गरज आहे. पवार साहेब आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत. त्यामुळे कोणी काहीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र हा स्थिरच राहणार.”