तृणमूल काँग्रेसने वक्तव्यापासून राखले अंतर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आसनसोलचे तृणमूल काँग्रेस खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी संसदेतील काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भाषणाचे मोठे कौतुक केले आहे. सिन्हा यांची ही भूमिका त्यांच्या पक्षासाठी धक्कादायक मानली जात आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी शुक्रवारी ट्विट करत राहुल गांधींच्या भाषणाचे कौतुक केले. तसेच राहुल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर न दिल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान मोदींचे दीड तासांचे भाषण ऐकले, परंतु यात राहुल गांधींनी विचारलेल्या कुठल्याच प्रश्नाचे उत्तर नव्हते. सर्व लोक राहुल गांधींची प्रशंसा करत असल्याचे सिन्हा यांनी स्वतःच्या ट्विटमध्ये नमूद केले. तसेच त्यांनी स्वतःच्या ट्विटला तृणमूल काँग्रेस तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अधिकृत ट्विटर हँडललाही टॅग केले आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने सिन्हा यांच्या वक्तव्यापासून अंतर राखण्यास सुरुवात केली आहे. सिन्हा यांची ही वैयक्तिक टिप्पणी असून ती तृणमूल काँग्रेसची भूमिका दर्शविणारी नाही असे उद्गार पक्षाचे राज्यसभा खासदार डॉ. शांतनू सेन यांनी काढले आहेत. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेचे आयोजन केले हे चांगलेच आहे, परंतु नेतृत्वाने आता पक्षाला एकजूट ठेवण्याचा प्रयत्न करावा असे सेन यांनी राहुल गांधींना उद्देशून म्हटले आहे.