ऑनलाईन टीम/ तरुण भारत
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam)यांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेनेतून बंड करताना ते माध्यमांसमोर ढसाढसा रडले होते. परंतु आता त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधत सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना केवळ तीनदाच मंत्रालयात आले. त्यामुळे त्यांची अगदी गिनीज बुकमध्ये नोंद झाली असे म्हणत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा मुलगा म्हणून उद्धव ठाकरे अजून किती दिवस महाराष्ट्राला ब्लॅकमेल करणार आहेत?, असा खोचक सवाल करत कदम यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.
रामदास कदम म्हणाले, “स्वत:साठी जगला तो मेला, इतरांसाठी जगला तो खऱ्या अर्थाने जगला. असं काम मुख्यमंत्री शिंदे यांचं सुरू आहे. दिवसरात्रं काम करत आहेत, मंत्रालयात लोकाना भेटत आहेत. त्यांच्या निवासस्थानी देखील नागरिकांना भेटत आहेत.”
हे ही वाचा : देशावरील दडपशाहीचे संकट कायमचे दूर कर; शिवसेनेचे गणरायाला साकडे
तसेच, “या अगोदरचे मुख्यमंत्री अडीच वर्षात केवळ तीनदा मंत्रालयात आले होते. अगदी गिनीज बुकात त्यांची नोंद झाली. मुख्यमंत्री कसा असावा, त्यांचा कामाचा सपाटा कसा असावा? हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही जण अनुभवी आहेत.” असंही यावेळी कदम यांनी बोलून दाखवलं.
दरम्यान, उद्धव ठाकरेंना आज जे काही मिळालंय ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा मुलगा असल्यामुळंच मिळालेलं आहे. आदित्य ठाकरेंना पक्षात आणि सत्तेत जे स्थान मिळालं ते उद्धव ठाकरेंचा मुलगा असल्यानंच मिळालं असल्याचं सांगत राज्यात शिवसेना कुणी उभी केली?, असा सवाल रामदास कदम यांनी विचारला आहे.
उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार असतील तर आम्हीदेखील राज्याचा दौरा करू, नेमकं काय सत्य आहे हे आम्हीही जनतेला सांगू असं म्हणत कदम यांनी ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे. शिवसेनेत बंड झाल्यापासून शिंदे गटातील एखाद्या नेत्यानं पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंवर अशा प्रकारचा मोठा आरोप केला आहे.