उद्धव ठाकरे यांनी फुंकले रणशिंग ः अडीच वर्षांपूर्वीच निर्णय घ्यायला हवा होता
प्रतिनिधी/ मुंबई
शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विधिमंडळात बसणे अशक्य आहे. हेच जर करायचे होते तर अमित शाह यांनी कबूल केल्याप्रमाणे अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद दिले असते तर ही वेळ आली नसती. हा मुख्यमंत्री शिवसेनेचा नाही, असे सांगून शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या विरोधात कायदेशीर लढा देण्याचे जणू संकेत दिले आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच शिवसेना भवनात येत समाज माध्यमांतर्पे जनतेशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, अमित शाह यांनी शब्द पाळला असता तर हेच सरकार आले असते, याचा पुनरुच्चार केला. तसेच आता पाचही वर्षे भाजपचा मुख्यमंत्री नसेल असा टोला लगावला. आता तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री करून शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्याचे सांगत आहेत. हेच तर मी अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो. माझ्यात आणि अमित शाह यांच्यात शिवसेना-भाजपने मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ वाटून घेण्याचे ठरले होते. जे काही घडले असते ते सन्मानाने झाले असते. मग महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता. त्यावेळी नकार देऊन आता भाजपने असे करण्याचे कारण काय? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी केला.
जे आता भाजपासोबत जाऊ इच्छित आहेत किंवा गेलेत त्यांनी हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे. अडीच वर्षांपूर्वी ज्यांनी शब्द मोडला आणि अशा पद्धतीने पाठीवर वार करून पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणत आहेत. हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊच शकत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. गेल्या 8-10 दिवसांत सोशल मीडियावरून अनेकांच्या भावना व्यक्त होत आहेत. एखाद्याने पद सोडल्यावर लोक रडतात, असे क्वचितच होते. ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. तुमच्या डोळय़ांतील अश्रूंशी कधी गद्दारी, हरामखोरपणा करणार नाही, असे आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले.
आठशे एकर जंगल राखीव
पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आम्ही मुंबईतले जवळपास 800 एकर जंगल राखीव करून ठेवले आहे. कांजूरमार्गची जमीन महाराष्ट्राची आहे. ती महाराष्ट्राच्या, मुंबईच्या हितासाठी वापरा. आरेचा मर्यादित वापर होणार होता. पण भविष्यात मेट्रो बदलापूर-अंबरनाथपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे कांजूरला कारशेड गेल्यानंतर तिचा मोठय़ा प्रमाणात वापर होणार आहे, असे उद्धव ठाकरे
म्हणाले.
…असे प्रकार देशहिताला घातक
सध्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमफतमहोत्सव सुरू आहे. पण या 75 वर्षांत लोकशाहीचे निघत असलेले धिंडवडे देशाच्या हिताला घातक असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. केवळ शिवसेनेला आव्हान द्यायचे आणि सरकारला धोका पोहोचवायचा म्हणून सूरतमार्गे गुवाहाटी आणि तेथून गोवामार्गे मुंबई असे लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत. असे प्रकार देशहिताला घातक असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
माझ्यावरचा राग मुंबईकरांवर नको…
हे सरकार आधीच्या सरकारचे निर्णय बदलण्याची शक्यता वर्तवली जात होती. तशी सुरुवातही आरेपासून झाली असून ठाकरे सरकारने कांजूरमार्गला नेलेले मेट्रोचे कारशेड आरेमध्येच करणार असल्याचे एकनाथ शिंदे सरकारने जाहीर केले. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, पर्यावरणाची हानी होईल असे आरेचे कारशेड रेटू नका. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. कांजूरमार्गचा जो प्रस्ताव आम्ही दिला, त्यात कुठेही अहंकार नाही. कृपा करून माझ्यावरील राग मुंबईवर काढू नका, अशी विनंतीही त्यांनी केली. आता आरेची झाडे तोडून झाली आहेत. पण मधल्या काळात तिथे बिबटय़ा फिरताना आढळल्याने तिथे वन्यजीव आहेत. आता तिथे रहदारी सुरू झाल्यावर आजूबाजूच्या पर्यावरणातले वन्यजीवन धोक्यात येईल, असेदेखील उद्धव ठाकरेंनी नमूद केले.
विरोधी पक्षनेता कोण?
विधानसभेत आता राष्ट्रवादी हा मोठा पक्ष ठरला असून विरोधी पक्षनेतेपदासाठी अनेकजण दावा करण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यात स्पर्धा आहे. धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद भूषविलेले आहे आणि त्यांनी त्या पदाला न्याय दिल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याकडून त्यांच्या नावाला पसंती दिली जाऊ शकते.