ऑनलाईन टीम / तरुण भारत :
निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह देऊन आम्हाला न्याय दिला आहे. आता ठाकरे गटाकडे राहिलेले आमदार, खासदारसुद्धा आमच्याकडे येतील. त्यामुळे त्यांच्या पक्षात फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच राहतील. त्यांनीही आता आमच्या पक्षात यावं, अशी ऑफर देत शिंदे गटातले मंत्री संदीपान भुमरे यांनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळले.
पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्याने उद्धव ठाकरेंवर शिंदे समर्थकांकडून सातत्याने टीका होत आहे. संदीपान भुमरे यांनीही ठाकरेंवर निशाणा साधला. भुमरे म्हणाले, 40 आमदार, 13 खासदारांसह 10 अपक्ष आमदार आणि अनेक नगरसेवक आमच्या गटात होते. त्यामुळे शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळणार याची खात्री होतीच. निवडणूक आयोगाने निकाल आमच्याच बाजूने दिला. आता ठाकरेंच्या गटात उरलेले आमदार आणि खासदारही आमच्या पक्षात येतील. उद्धव ठाकरे यांचा पक्ष, गट वैगरे आता काहीच राहिले नाही. त्यांचे आता कोणतेही अस्तित्व राहिले नाही. त्यामुळे बाप-लेकानेही आता आमच्या पक्षात यावे.
अधिक वाचा : चिन्ह आणि नाव मिळविण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा
उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळण्याचा विषयच नाही. कारण फक्त सहानुभूतीवर पक्ष आणि राजकारण चालत नसते.आमच्यासाठी बाळासाहेब ठाकरे महत्वाचे असून, इतर ठाकरे असतील किंवा नसतील याच्याशी आम्हाला काहीही देणंघेणं नाही, असेही भुमरे म्हणाले.