जोरदार वाऱयाचा फटका, तिन्ही मच्छीमार सुखरूप
वार्ताहर/ हर्णे
दापोली तालुक्यातील उटंबर येथील चांगा भोईनकर यांच्या ‘अन्नपूर्णा’ या नौकेला शनिवारी दुपारी 2 च्या दरम्यान हर्णे बंदरात आणताना जोरदार वाऱयामुळे जलसमाधी मिळाली. हर्णे बंदरात जेटी असती तर ही दुर्घटना घडली नसती, असे येथील मच्छीमारांनी यावेळी सांगितले. या दुर्घटनेत बोटीवरील तिन्ही मच्छीमार सुखरूप असले तरी बोटीचे पूर्ण नुकसान झाले आहे.
दापोली तालुक्यातील उटंबर येथील चांगा भोईनकर हे आपली 2 सिलिंडरची अन्नपूर्णा नौका घेऊन श्रीवर्धनजवळ मासेमारी करत होते. मात्र समुद्रात वाऱयाचा वेग वाढू लागल्यामुळे त्यांनी अशा धोकादायक वातावरणात मासेमारी करण्याऐवजी हर्णे बंदरात परतण्याचा निर्णय घेतला. या परतीच्या प्रवासात क्लच पेटचा बिघाड झाल्यामुळे बोट बंद पडली. याचवेळी हर्णेतील परशुराम चोगले यांची बोट त्यांच्या मदतीला आली. त्यांनी आपल्या बोटीला बांधून या बोटीला हर्णेपर्यंत सुखरूप आणले. मात्र हर्णे बंदराजवळ वाऱयाचा वेग अधिकच वाढल्यामुळे मोठय़ा हिसक्याने या बोटीच्या फळ्य़ांना तडे गेले. यामुळे बोट तेथेच बुडाली.
भोईनकर यांना मोठा धक्का
हर्णे बंदरातील मच्छीमारांनी यावेळी तातडीने धावून ही नौका किनाऱयाला आणली. यामध्ये बोटीवरील तिन्ही मच्छीमार सुखरूप असले तरी बोटीचे पूर्ण नुकसान झाले आहे. हर्णे बंदरात जेटी असती तर ही दुर्घटना टाळता आली असती, असे येथील मच्छीमारांचे म्हणणे आहे. नौकेचे मालक 65 व्या वर्षी ही आपला मुलगा व एका साथीदाराला घेऊन गरजेपुरती मासेमारी करत असत. मात्र अचानक घडलेल्या या दुर्घटनेने भोईनकर यांना मोठा धक्का बसला आहे. आता या वयात कोणती बँक नवीन नौकेसाठी कर्ज देईल आणि कुटुंबाचा गाडा कसा हाकला जाईल, या चिंतेने भोईनकर कुटुंब व्यतीत झाले आहेत. शासनाने या मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी मदत करावी, अशी मागणी येथील मच्छीमार करत आहेत.