ऑनलाईन टीम/ तरुण भारत
चिखली (सांगली) : चिखली ता. शिराळा येथे पाटबंधारे विभागाने कालव्याच्या कामास सुरुवात करण्याचा प्रयत्न करताच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कालव्याचे काम बंद पाडले.जोपर्यंत जमिनीचा मोबदला व नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत काम सुरु करु नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. याठिकाणी काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याआधी हि तीन वेळा काम सुरू करण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभागाने केला होता. तिन्ही वेळी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम बंद पाडले होते.
चिखली गावातून वारणा डावा कालवा जातो. येथील 40 एकर जमिनी 33 वर्षे भूसंपादन न करता कालव्याचे खोदकाम पाटबंधारे विभागाने केला आहे. मात्र शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला व नुकसान भरपाई अजूनही मिळालेली नाही. या संदर्भात शिराळा तहसील कार्यालयासमोर अनेकवेळा शेतकऱ्यांनी उपोषण व आनंदोलन केले होते. दरम्यान आज गाडीतळ येथे सहाय्यक अभियंता अनिल लांडगे यांनी काम करण्यास सुरुवात केली. मात्र शेतकऱ्यांनी काम बंद पाडले. तुमच्या मागण्या मी वरीष्ठ अधिकाऱ्यांना सांगतो. हा विषय महसूल विभाग व जलसंपदा विभाग यांचा असल्याचे लांडगे यांनी सांगितले. यावेळी सर्व पाटबंधारे अधिकारी ,कर्मचारी वर्ग व शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा- चांदोली अभयारण्य क्षेत्रात भुस्खलन; नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले
शेतकऱ्यांच्या काय आहेत मागण्या
-जोपर्यंत जमिनीचा मोबदला व नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही,तोपर्यंत काम सुरू करू नये.
-तसेच सारखे काम सुरु करायला येऊन शेतकऱ्यांशी पाठ शिवणीचा खेळ करू नये.
-शेतकऱ्यांना मानसिक त्रास देवू नये.