1 जुलैपासून 31 ऑगस्टपर्यंत 62 दिवस चालणार यात्रा : गुहेच्या सुरक्षेसाठी यंदा प्रथमच आयटीबीपी तैनात : अन्य सुरक्षा दलेही दिमतीसाठी सज्ज
वृत्तसंस्था /नवी दिल्ली, जम्मू
यंदा अमरनाथ यात्रा शनिवार, 1 जुलैपासून सुरू होत असून 31 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. वार्षिक यात्रेचा कालावधी 62 दिवसांचा असून भाविक बालटाल आणि पहलगाम या दोन मार्गांनी प्रवास करू शकणार आहेत. शिवभक्तांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मीर सज्ज असून पहिली तुकडी शुक्रवारी रवाना होणार आहे. गेल्यावषी 3.45 लाख भाविकांनी गुहेला भेट दिली होती. मात्र, यंदा हा आकडा 5 लाखांवर जाऊ शकतो, असे श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच गेल्या वषी अमरनाथ यात्रेदरम्यान गुहेजवळ झालेल्या आपत्तीमुळे यंदा गुहेच्या सुरक्षेसाठी आयटीबीपीच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. गुहेजवळील सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडून काढून घेतली आहे. यावेळी एनडीआरएफचीही सुरक्षा ठेवण्यात आली आहे. गृह मंत्रालयात गुरुवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर सुरक्षाविषयक काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. गृह सचिव अजय भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आयटीबीपी, बीएसएफ, एनडीआरएफ, सीआरपीएफ, आयबी आणि ‘रॉ’चे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेला अंतिम स्वरूप देण्यात आले. अहवालानुसार, जम्मू-काश्मीर पोलीस आणि अमरनाथ श्राईन बोर्डाने गुहेच्या सुरक्षेसाठी आयटीबीपीचे जवान तैनात करावेत, असा सल्ला दिला होता. जम्मू-काश्मीर पोलिसांनी मांडलेले मुद्दे आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन सुरक्षा दलांच्या अतिरिक्त जवानांची तैनातीही केली जात आहे. गेल्या वषी अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीनंतर आलेल्या पुराच्यावेळी ‘आयटीबीपी’ने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आयटीबीपीच्या जवानांना नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याची चांगली जाण असल्यामुळे त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येत असल्याचे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
3 लाख भाविकांची नोंदणी
1 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी आतापर्यंत सुमारे 3 लाख भाविकांनी आगाऊ नोंदणी केली आहे. शनिवारी भगवती नगर येथून भाविकांची पहिली तुकडी पवित्र अमरनाथ गुहेकडे रवाना होणार आहे. श्री अमरनाथ श्राईन बोर्ड आणि स्थानिक प्रशासनाने भाविकांच्या सुविधा लक्षात घेऊन सर्व प्रकारची तयारी पूर्ण केल्याची माहिती दिली. याशिवाय पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांसोबतच, जम्मू-काश्मीरचे प्रवेशद्वार लखनपूर ते काश्मीरपर्यंत इतर आवश्यक सुविधांची उपलब्धता पूर्ण करण्यात आली आहे. यंदा यात्रेत विक्रमी संख्येने भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. गेल्या वषी 44 दिवसांच्या प्रवासात सुमारे 20 दिवस खराब हवामानाचा फटका बसल्याने प्रवासावर मोठा परिणाम झाला होता.
श्वान पथकासह एनडीआरएफ तैनात
केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणत्याही दहशतवादी कृत्याला तोंड देण्यासाठी आणि आपत्तींना त्वरीत प्रतिसाद देण्यासाठी आंतर-एजन्सी समन्वय आणि ड्रोन, श्वान पथके आणि हवाई सर्वेक्षण पथकांच्या वापरावर भर दिला आहे. एनडीआरएफ श्वान पथकाची एक टीम आधीच त्यांना उंचीवर आणि थंड हवामानाशी जुळवून घेण्यासाठी तैनात केली आहे. गतवषी अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला होता. त्यानंतर अमरनाथ यात्रेदरम्यान आयटीबीपीची एक कंपनी तैनात करण्यात आली होती. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी मदत आणि बचावकार्य अतिशय नेत्रदीपक पद्धतीने केल्यामुळेच यावेळी गृह मंत्रालयाने अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी आयटीबीपीकडे सोपवली आहे.