ऑनलाईन टीम/तरुण भारत
रात्री केवळ दोन ते तीन तास झोपणारे व्यक्ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून मिळाले आहेत. शिंदे सरकार अतिशय स्थिर आहे. त्याला कोणताही धोका नाही. यापुढचा कार्यकाळ शिंदे सरकार पूर्ण करेल. तसेच येणाऱ्या आगामी निवडणुकीतही आम्ही एकत्र काम करणार आहोत. मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. अजून खातेवाटप झालेलं नाही. त्यामुळे कोणतं खातं मला मिळणार हे माहीत नाही. लवकरच खातेवाटप होईल त्यांनतर समजेल की कोणाला कोणतं खातं मिळालं आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यामध्ये ज्यांना आश्वासन दिलं आहे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल. तसेच शिवसेना (Shivsena) आमचीच आहे, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर Dipak Kesarkar) यांनी केलं आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे बोलताना केसरकरांनी, संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे यांनी शुक्रवारी घेतलेल्या भेटीवरही भाष्य केलं. ते म्हणाले, काल छत्रपती घराण्याच्या वंशजांची भेट घेतली, त्यांच्या काय संकल्पना आहेत त्या जाणून घेतल्या. यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाल्या.
शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. यांनतर शिंदे गटातील अनेक आमदार नाराज आहेत. अनेकांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. यामध्ये संजय शिरसाट यांचाही समावेश आहे. शिरसाट यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे. यावर बोलताना केसरकर म्हणाले, संजय शिरसाट यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. ते नाराज नाही आहेत. पहिल्या टप्प्यात संधी मिळाली नसली तरी दुसऱ्या टप्प्यात त्यांना संधी मिळणार आहे. त्याचबरोबर नाराज असलेले ठाकरे सरकारमधील माजी मंत्री बच्चू कडू आणि आमदार भरत गोगावले यांना दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल. लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे, असे ते म्हणाले.
हे ही वाचा : संजय शिरसाटांकडून उद्धव ठाकरेंचा ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून उल्लेख करत ट्वीट; नाराजी नाट्यावर दिलं स्पष्टीकरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविषयी (Eknath Shinde) बोलताना केसरकर म्हणाले, रात्री केवळ दोन ते तीन तास झोपणारे व्यक्ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून मिळाले आहेत. त्यामुळे त्यांचा योग्य उपयोग राज्याने करून घेतला पाहिजे. राजकारण थोडं बाजूला ठेवून समाजकारणाची एकत्र आलं पाहिजे. मुख्यमंत्री शिंदे हे चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने ते निर्णय घेत आहेत.
शिंदे सरकारने एनडीआरएफच्या निकषाच्या डबल पूरग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. त्यामुळे पूरग्रस्त किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. ती मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोहचली पाहिजे यासाठी सरकारचा प्रयत्न असणार आहे, कुठंही चुकीची घटना घडणार नाही पंचनामे करून मदत दिली जाणार आहे, असे केसरकर म्हणाले.
बंडखोरीवर बोलताना केसरकर म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हा हिंदुत्वाचा विचार होता. तोच हिंदुत्वाचा विचार आम्ही पुढे घेऊन जात आहे. दोन्ही काँग्रेस बरोबर जाणे हा त्यांचा विचार नव्हता. हिंदुत्वासाठी आणि आपल्या मूळ पक्षासाठी केलेला हा उठाव आहे. आम्ही कोणतीही वास्तू बळकवण्याचा प्रयत्न करत नाही. छोट्या शब्दामधून चुकीचा अर्थ काढणं योग्य नाही. तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या शहीद या वक्तव्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं.
शिंदे हे नक्षलग्रस्त भागाचे पालकमंत्री होते. त्यामुळे ते त्या भागात काम करत होते. ते चांगले काम करत असल्याने त्यांना अनेक धमक्या त्यांना आल्या होत्या. त्यांना जिवेमारण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यामुळे जर कुठं दगाफटका झाला असता तर ते शहीदच झाले असते, असे केसरकर म्हणाले.
संजय राऊत यांना ईडीने पात्राचाळ घोटाळा प्रकरणी अटक केली आहे. याबाबत विचारलं असता केसरकर म्हणाले, संजय राऊत यांच्या विरोधात ठोस पुरावे असल्याशिवाय त्यांना अटक झालेली नाही. तसेच त्यांच्या कोठडी वाढत नाही. त्यांच्या विरोधात भक्कम पुरावे असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांना अटक झाली आहे. पात्राचाळ घोटाळा हा मुंबईतील एका मोठ्या घोटाळ्यापैकी एक घोटाळा आहे. या मोठ्या घोटाळ्यातील इतर अनेकजण आत आहेत. पुरावे नसते तर राऊत मात्र बाहेर असते, असे ते म्हणाले.