ऑनलाईन टीम/तरुण भारत
अल्टिमेटम देणाऱ्यांनी प्रथम स्वत:चा पक्ष सांभाळावा. एखाद्या पक्षाने जरी अल्टीमेटम दिला असला तरी त्यावर राज्य चालत नाही किंवा त्यांनी अल्टिमेटम दिला म्हणून राज्य सरकार निर्णय घेत नाही. प्रशासनाची एक व्यवस्था असते. येथे कायद्याचं राज्य असल्यामुळे कोणाच्या अल्टीमेटमवर निर्णय घेतले जात नाहीत. राज्यात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित आहे असं सांगत शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी राज ठाकरेंवर (raj thackeray) अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. (shiv sena leader and mp Sanjay Raut criticizes Raj Thackeray)
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांनी सभेत केलेल्या वक्तव्यावर टीका केली. सभेतून इशारे किंवा धमक्या दिल्या म्हणजे परिस्थिती बिघडली असं होणार नाही. त्यामुळे आम्ही काही इशारे दिले, याच्या भ्रमात कुणीही राहू नये. कुणीही मनात आणलं तरी देखील कोणीही राज्याची सुव्यवस्था बिघडवू शकत नाही, राज्य सरकार यासाठी सक्षम आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.
अल्टिमेटम देणाऱ्यांनी स्वतःचा पक्ष सांभाळावा
“अल्टिमेटम देणाऱ्यांनी अगोदर स्वत:चा पक्ष सांभाळावा. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे म्हटल्यावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार संपूर्ण देशात जी भूमिका घेतली जाईल ती महाराष्ट्रात घेतली जाईल. राज्यात बेकदायेदशीर कृत्य केलं जाणार नाही. राज्य सरकार यासाठी सक्षम आहे. तसेच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip walse patil) हे एक संयमी आणि सक्षम नेते आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तितकेच मजबूत नेते आहेत. महाविकास आघाडीचे मार्गदर्शक शरद पवार सगळ्यात अनुभवी नेते आणि प्रशासक आहेत. त्यामुळे या राज्यात कोणी अल्टिमेटम देऊन वातावरण बिघडवण्याच्या प्रयत्नात असतील तर ते संभ्रमात आहेत. राज्याची जनता सुज्ञ आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं.
कुणीही राज्याची सुव्यवस्था बिघडवू शकत नाही
कुणीही मनात आणलं तरी राज्याची सुव्यवस्था बिघडवू शकत नाही. आज शुभ दिवस आहे. तसेच आज अक्षय्य तृतीया आहे. मुस्लिम बांधवांचा रमजान सुद्धा आहे. त्यामुळे लोकांना त्यांचे सण आणि उत्सव साजरे करून द्यावे, तेवढचं आम्ही सांगू. या राज्याच्या प्रशासनाला फार मोठा अनुभव आहे. राज्याच्या कार्यकर्त्यांना देखील मोठा अनुभव आहे. कुणीही उठतो आणि धमक्या देतो असं चालणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.