विरोधकांचे मला बदनाम करण्याचे हे प्रयत्न
प्रतिनिधी/रत्नागिरी
मी शिवसेना (Shivsena) पक्ष सोडून कोठेही जाणार नाही. माझी निष्ठा सदैव बाळासाहेबांच्या पायाशी आहे. लवकर शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) रत्नागिरी दौरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. शिवसैनिकांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये. मी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनतेच आहे. मी शिवसेनेचा आमदार आहे. विधानसभेत काही कामानिमित्त मंत्र्यांना भेटणे चुकीचे आहे का? असा सवालही शिवसेना नेते आमदार राजन साळवी (Rajan Salavi) यांनी उपस्थित केला. माझी निव्वळ बदनामी करण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सूरु आहेत, असा आरोपही यावेळी आमदार राजन साळवींनी केलं.
दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंच्या बाजूने असणाऱ्या नेत्यांनाही गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. त्यातच शिवसेना आमदार राजन साळवी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. राजन साळवी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटल्याची आणि शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली. त्यावर आता राजन साळवींनी सविस्तरपणे भूमिका मांडली आहे.
राजन साळवी यांनी भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय की, “काल सायंकाळपासून माध्यमांकडून मला असं समजलं की, मी (राजन साळवी) देवेंद्र फडणवीसांना भेटलो आणि शिंदे गटात सामील होणार, अशा बातम्या आल्या आहेत. गेल्या ४० वर्षांपासून मी शिवसेनेत काम करतोय. शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, शिवसेनेचा तीन वेळा आमदार आणि शिवसेनेचा उपनेता म्हणून काम करतोय.”
पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरेंसोबत -राजन साळवी
“महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी झाल्यात, पण मी आधीच सांगितलंय की आमच्या निष्ठा बाळासाहेबांच्या चरणी आहेत. माझ्याही निष्ठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पायाशी आहेत. त्यामुळे मी पहिल्या दिवसांपासून उद्धव ठाकरेंसोबत आहे”, असं राजन साळवी यांनी स्पष्ट केलं.
“बातम्यांमधून असं कळलं की, मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो. मी शिंदे गटात जाणार आहे. त्यामुळे मी खुलासा करू इच्छितो की, मी मरेपर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरेंसोबत काम करत राहणार आहे.”
शिवसेनेच्या निष्ठेबद्दल मला कुणी सांगू नये; राजन साळवींचा टोला
“शिवसेनेच्या निष्ठेबद्दल मला कुणी गोष्टी शिकवण्याची गरज नाहीये. ४० वर्षांपासून मी शिवसेनेत काम करतोय. जेव्हा जिल्हाप्रमुख होतो, तेव्हा बाळासाहेबांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च जिल्हाप्रमुख म्हणून मला शिवतीर्थावर मला ढाल दिली होती”, असं राजन साळवी यांनी यावेळी सांगितलं.