ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारचं हे पहिलं विशेष अधिवेशन असून, बंडखोरीनंतर आज पहिल्यांदाच सेनेचे दोन गट आमने-सामने आहेत. दरम्यान, विधिमंडळाच्या कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वीच विधानभवनातलं शिवसेना विधिमंडळ कार्यालय सील करण्यात आलं आहे. या कार्यालयात शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक होणार होती. मात्र, तत्पूर्वीच या कार्यालायाला टाळा लावण्यात आला. शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या आदेशाने कार्यालय बंद ठेवण्यात आल्याची सूचना दरवाजावर लावण्यात आली आहे. मात्र, ही सूचना कोणी दिली, याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
शिवसेनेचे प्रदोत सुनील प्रभू यांनी असं कोणतंही पत्र विधिमंडळ पक्ष कार्यालयाला दिलं नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे शिंदे गटाने ही कुरघोडी केल्याची चर्चा आहे. कारण शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आम्हीच शिवसेना पक्ष असल्याचा दावा यावूर्वीच केला आहे. शिवसेना विधीमंडळ पक्ष हा आमचा असून दोन तृतीयांश आमदारांचा आम्हाला पाठिंबा असल्याचा दावा बंडखोर गटाने केला आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेने बंडखोरांवर कारवाईसाठी पावले उचलली आहेत. शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाचा परिणाम विधीमंडळातील पक्षाच्या दालनावरही दिसून येत आहे. शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालय यांनी कळविल्यामुळे दालन बंद ठेवण्यात आल्याची सूचना लावण्यात आली आहे. या पक्ष कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढण्यात आले आहे.
शिवसेना आणि शिंदे गटात वादाची नवी ठिणगी पडल्याने अधिवेशनात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.