सरवडे/ विजय पाटील
कोल्हापूर जिल्हय़ातून शिवसेनेचे एकमेव निवडून आलेले आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री शिंदे गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांचा हा निर्णय राधानगरी विधानसभा मतदारसंघातील मूळ शिवसेनेला रुचलेला नाही. त्यांच्या निर्णयाने मूळ शिवसेनेत असंतोष निर्माण होऊन त्याचे पडसाद निषेध, मोर्चाच्या रुपाने उमटले. पर्यायाने शिवसेनेत फूट पडून दोन गट निर्माण झाले आहेत. आमदार आबिटकर यांचे कर्तृत्व आणि शिवसेनेचे पाठबळ हा मिलाफ दोघांनाही हितकारक होता, परंतु बदललेल्या परिस्थितीचा फटका आता शिवसेनेच्या दोन्ही गटांना सहन करावा लागणार आहे.
राधानगरी मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य कायमच राहिले आहे. अपवाद वगळता आमदारकीची सता ही काँग्रेसच्या मतावरच ठरली आहे. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद भक्कम नसली तरी प्रत्येक गावात शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, ही जमेची बाजू आहे. सलग दोन विधानसभा निवडणुकीत आमदार के. पी. पाटील यांनी विजय संपादन करून या मतदारसंघात प्राबल्य निर्माण केले होते. त्यांच्या विरोधात कोण टिकणार नाही, अशी परिस्थिती असताना प्रकाश आबिटकर यांनी शिवसेनेची उमेदवारी घेऊन के. पी. पाटील यांना पराभूत केले. आबिटकर यांना मिळालेला हा विजय हा केवळ शिवसेनेच्या मतांचा नव्हता तर काँग्रेसच्या छुप्या पाठबळाचा देखील होता.
पहिल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या आमदार आबिटकर यांनी शिवबंधन बांधून दुसऱया निवडणुकीत यश मिळवले. मिळालेल्या यशाची जाणीव ठेवून त्यांनी मतदारसंघात लोकसंपर्क आणि विकासकामांच्या माध्यमातून सामान्यांत आपले स्थान भक्कम केले. 2019 च्या निवडणुकीत आबिटकर यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून के. पी. पाटील पुन्हा ठाकले होते. त्यामुळे आबिटकर यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र आबिटकर यांनी हे आव्हान परतवून सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठबळावर विजयश्री खेचून आणली.
दोनवेळा मोठय़ा आव्हानात्मक परिस्थितीला भेदून आमदार आबिटकर यांनी या मतदारसंघात आपले स्थान भक्कम केले असतानाच राज्यातील राजकीय घडामोडीत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे गटात दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पाठोपाठ खासदार प्रा. संजय मंडलिकही शिंदे गटात गेले. या निर्णयाने मुळ शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज झाले तर आमदार आबिटकर व खासदार प्रा. मंडलिक यांना मानणारे कांही कार्यकर्ते दुखावले गेले. त्यांचा निर्णय शिवसैनिकांना न पटल्याने त्याचे पडसाद मोर्चा, निषेधाच्या रुपाने उमटले. त्यामुळे मतदारसंघातील शिवसेना दोन गटात विभागली गेली.
आमदार आबिटकर यांच्याशी फारकत झाल्याने शिवसेनेला आता नवीन उमेदवार निवडावा लागणार आहे तर शिवसेनेला मानणाऱया मतदारांचे मन दुखावल्याने पुढील निवडणुकीत आबिटकर यांना मतांचा फटका सोसावा लागणार आहे. खासदार मंडलिक यांना या तालुक्याने मोठे मताधिक्य दिले होते, मात्र भविष्यात त्यांनाही येथून मोठे मताधिक्य मिळणे अवघड आहे. मात्र शिंदे गटाची भाजपशी युती झाल्यास भाजपच्या मतांचा या दोघांना लाभ होऊ शकतो, अशी स्थिती आहे.
मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेसचे प्राबल्य असूनही आघाडी-बिघाडीत या पक्षाने आपला उमेदवार गमावला आहे. नेत्यांच्या एकजुटीचा अभाव व स्वतःच्या सोयीनुसार घेतल्या जाणाऱया भूमिकांमुळे कार्यकर्त्यांची फरफट सुरू आहे. आता कार्यकर्तेही राजकीय सोय करु लागले आहेत. अनेक जण आमदार आबिटकर गटात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांच्यात दोन गट पडले असून उघड नसली तरी छुपी गटबाजी राष्ट्रवादीला घातक ठरत आहे.
मतदारसंघात भाजपची ताकद भक्कम नाही. मात्र देशात भक्कम असणाऱया या पक्षाकडून मतदारसंघात प्राबल्य वाढवण्याचे किंवा कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचे कोणतेही व्हिजन दिसत नाही. शेतकरी संघटना, जनता दल, शेकाप या पक्षांचे अस्तित्व असले तरी वरिष्ठ युतीवरच या मतदारसंघातील नेते व कार्यकर्त्यांना अवलंबून रहावे लागत आहे. मात्र आबिटकर विविध प्रश्न व विकासकामे घेऊन लोकांपर्यंत पोहोचत आहेत.
उद्योजक चंद्रकांतदादा शिवसेनेत
आमदार आबिटकर यांच्या शिंदे गटात गेल्यानंतर राधानगरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद निश्चितच कमी झाली. मात्र अशा अडचणीच्या परिस्थितीत राधानगरी तालुक्यातील उद्योजक चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाला बळ दिले आहे. पाटील हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढले होते. त्यांनी 7 हजार मते मिळवली होती. या मतदारसंघात पुन्हा लढण्याच्या तयारीने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असावा, याची चर्चा सुरू आहे