मविआचे ठाकरे सरकार शिवसेनेतील ऐतिहासिक बंडानंतर कोसळले आणि राजकारणाला धक्क्या मागून धक्के देत मोदी-शहा जोडीनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करुन राज्यात भाजपा प्रणित शिंदेशाही आणली. तथापि या सगळय़ा राजकारणाचे कवित्व अजून संपलेले नाही. शिवसेनेतील बंडखोरीचे वारे दिल्लीत खासदारापर्यंत पोहोचले आहे. शिवसेनेचे बारा खासदार शिंदेशाहीत सहभागी होणार, हे स्पष्ट झाले आहे. आमचीच शिवसेना खरी, असा दावा करत एकनाथ शिंदे गट शिवसेनेवर मालकी सांगू लागला आहे. या साऱया पार्श्वभूमिवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आपल्या धोरणांचा वाटचालीचा आढावा घेण्याची, चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवसैनिकांची विठ्ठलाबद्दल आमची तक्रार नाही. विठ्ठलाभोवतीच्या बडव्यावर रोष आहे. त्यामुळेच शिवसेनेत बंडाळी किंवा उठाव झाला, असे म्हणताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करुन नव्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. शिवसेनेची दिशा बदलली, असे संकेत यातून दिसत असले तरी पाठिंबा वेगळा आणि भूमिका वेगळी असू शकते. आगामी काळात काय होते ते बघायचे. पण, काही राजकीय पंडितांच्या मतानुसार सन्मानजनक तोडगा निघून पुन्हा फडणवीस-ठाकरे एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको. राजकारण हा शक्यतांचा खेळ असतो. तेथे कोण कुणाचा कायमचा मित्र वा शत्रू नसतो. वरुन कितीही कीर्तन असले तरी आतून सारा तमाशाच असतो. म्हणून राजकारणाला गुन्हेगारीचा शेवटचा अड्डा असेही संबोधले जाते. आणि याची अनुभूती गेली काही वर्षे पाठोपाठ येते आहे. निवडून येणे, सत्ता मिळवणे, सत्ता राखणे, निधी आणणे, मतदारसंघात लोकप्रियता टिकवणे ही सोपी कसरत नाही. एककाळ असा होता त्याकाळी नेत्याने दगडाला शेंदूर लावला तरी त्याचा देव व्हायचा. आता ते दिवस राहिले नाहीत आणि तसे नेतेही नाहीत. ओघानेच सत्ता जितकी महत्त्वाची तितकेच मतदारसंघ राखणे, पुन्हा विजयी होणे हे महत्त्वाचे. राज्यात शरद पवार यांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जनादेश दुर्लक्षित करत भाजपा-शिवसेना युतीत फूट पाडली आणि मविआ प्रयोग केला. मविआचा प्रयोग अनैसर्गिक व जनादेश डावलणारा होता. पण, राजकारणात सर्व चालते. सत्ता महत्वाची. अडीच वर्षे सत्ता झाल्यावर या प्रयोगाचे फळ म्हणजे मविआच्या घटक पक्षात खदखदणारा असंतोष आणि शिवसेनेतील बंड. शिवसेनेच्या या आमदारांना अशीच पुढील काही वर्षे गेली तर आपण पुन्हा निवडून येणार नाही, याची भीती वाटू लागली. मविआतील राष्ट्रवादी काँग्रेस शंभर प्लसचे टार्गेट घेऊन राज्यात निवडणूक तयारी करताना दिसू लागली. मविआचे जागा वाटप कोणाला होणार, बंडखोरी होणार की नाही, कुणाकुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार, याबद्दल तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले. शिवसेनेत त्यामुळे खदखद वाढली. शिवसेनेत जशी ही खदखद तशी ती मविआच्या अन्य घटक पक्षातही होती. पंढरपूरची पोट निवडणूक ही लिटमस टेस्ट होती. पंढरपूरला मविआच्या सर्व घटक पक्षांनी ताकद लाऊनही तेथे भाजप उमेदवार विजयी झाला. तिथपासून नेते मंडळींच्यात कुजबूज सुरु झाली. शिवसेना आमदार, खासदारांना समजून चुकले मविआ प्रयोग आपल्या व आपल्या संघटनेच्या मुळावर नेणारा आहे. यातून बाहेर पडले पाहिजे. राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत झालेली फुटाफूट व नंतरचे बंड त्यातूनच शिंदेशाही अस्तित्वात आली व शिवसेनेचे आमदार-खासदार एकनाथ शिंदेच्या सोबतीला गेले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या भागात राहतात त्याभागाचे नाव कलानगर आहे. सोशल मीडियात आता कलानगरचे नाव अकेलानगर होणार, अशी थट्टा सुरु झाली. पन्नासहून अधिक आमदार फुटून गेल्याचा, त्यांनी उठाव केल्याचा तो परिपाक होता. या पार्श्वभूमिवर शिवसेनेला, उद्धव ठाकरे यांना आत्मचिंतन करुन धोरण ठरवणे आवश्यक आहे. राजकारण आणि नाटक हा मराठी माणसांचा आवडीचा विषय आहे. अलीकडे राजकारणच नाटकी बनल्याने तेथे सतत करमणूक आहे. मराठीजन काम-धाम सोडून सदासर्वकाळ ऑनलाईन राजकीय अपडेट घेताना दिसत आहेत. हे लोकहिताचे नाही. लक्ष हवे पण, सकाळी सात ते रात्री बारा ऑनलाईन अपडेट घेण्याची गरज नाही. ठाकरेंनी शर्ट कोणता घातला त्यांचा वरचा खिसा नॉटरिचेबल आहे. इथंपासून फडणवीसांची देहबोली आणि संजय राऊतांची न्याहरीनंतरची प्रेस ते रात्री कोण-कुणाला भेटले इथंपर्यंत सारे अपडेट सर्वसामान्य माणसांच्या व्यापक भल्याचे नाहीत. राजकारणाची नोंद ठेवली पाहिजे आणि चांगले प्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत. पण, जादूचा खेळ बघत बसल्यासारखे चोवीस तास सात दिवस ऑनलाईन राहण्याची गरज नाही. अचूक आणि नेमकी माहिती देण्यासाठी आजही चांगली वृत्तपत्रे आहेत. लोकांनी उद्ममशिल राहिले पाहिजे. शेती, व्यापार, व्यवसाय, संशोधन, ज्ञानार्जन यामध्ये वेळ दिला पाहिजे. पण, रोजच सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक मंडळी ऑनलाईन राहत आहेत. कधी वाझे, कधी राणा, कधी राणे तर कधी हिरवळ, डोंगर, कधी हनुमान चालीसा तर कधी नामांतर यातून जनतेचे, महाराष्ट्राचे आणि देशाचे भले होणार नाही. याला वेळीच पायबंध घातला पाहिजे. शिवसेनेने एनडीए उमेदवाराला राष्ट्रपती निवडणुकीसाठी पाठिंबा दिल्याने भाजपा-शिवसेना युतीची चर्चा सुरु झाली आहे. संवादासाठी दोन्ही पक्षाची दारे उघडली गेली आहेत. पण, शरद पवारांनी हाच मोका साधत मविआ आगामी निवडणुका एकत्र लढवणार, असा चेंडू टाकला आहे. काँग्रेसमध्येही धुसफूस आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी उशीरा सहज आलेले नव्हते. तूर्त शिवसेनेने एनडीएला दिलेला पाठिंबा आणि बदलत असलेली हवेची दिशा लक्षवेधी आहे. राष्ट्रपती-उपराष्ट्रपती निवडणुकीनंतर राजकीय तांडव पुन्हा सुरु होईल. तूर्त शिवसेनेने आपली दिशा बदलली आहे.
Previous Articleमहिला युरो स्पर्धेत जर्मनी उपांत्यपूर्व फेरीत
Next Article पंतप्रधान मोदींची राष्ट्रपतींशी चर्चा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.