कोल्हापूर प्रतिनिधी
बेळगाव येथे आज, मंगळवारी (1 नोव्हेंबर) होणार्या काळा दिनाच्या समर्थनार्थ शिवसेने (उध्दव ठाकरे गट)तर्फे ‘दिवस वेदनांचा-दौड मशालीची’ कोल्हापूर-बेळगाव मशाल रॅलीचे सोमवारी आयोजन करण्यात आले. बेळगाव, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे…,जय भवानी, जय शिवाजी…, शिवसेना झिंदाबाद…., शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा विजय असो…अशा घोषणा देत शिवसैनिक बेळगावकडे रवाना झाले. दरम्यान भाजप सरकारकडून सुरु असलेल्या दडपशाहीला झुगारुन मराठी माणसासाठे पेटविलेली ही मशाल बेळगावात नेणारच, असा निर्धार जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला.
राजर्षी शाहू समाधीस्थळ येथे सकाळी साडे दहाच्या सुमारास सर्व शिवसैनिक एकत्र आले. या ठिकाणी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत समाधीस्थळाला अभिवादन करुन मशाल प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर ही मशाल चित्ररथामध्ये विराजमान करण्यात आली. या ठिकाणी बेळगाव, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे…,जय भवानी, जय शिवाजी…, शिवसेना झिंदाबाद…., शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा विजय असो…अशा घोषणांच्या गजरात मशाल रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरुन उजळाईवाडीमार्गे बेळगावकडे रवाना झाली.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, सीमाभाग महाराष्ट्रात यावा ही अनेक दिवसांपासून आमची मागणी आहे. तो आमचा हक्क असून मिळविणारच. मराठी आमचा श्वास व आत्मा आहे. त्याला जर कोणी टोचणार असेल ते खपवून घेतले जाणार नाही. सीमाभागातील मराठा माणसांच्या मागे शिवसेना (उध्दव ठाकरे गट) ठाम आहे. भाजपकडून दडपशाही व हुकुमशाही सुरु असून त्याला झुगारुन मराठी माणसासाठी पेटविलेली मशाल बेळगाव नेणारच आहे.
जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, केंद्रात व कर्नाटकात भाजपचे सरकार असून मराठी माणसाला दडपण्याचेच काम सुरु आहे. ही दडपशाही उचकटून आम्ही पुढे जाण्याचे काम करणार आहे.
कर्नाटक येथील शिवसेने (उध्दव ठाकरे गट) च्या पदाधिकार्यांनीही आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. सीमाभागातील मराठी बांधव हे महाराष्ट्रात येण्यासाठी गेली 65 वर्षे शांततेच्या मार्गाने लढा देत आहे. या लढय़ामध्ये शिवसेनेने नेहमीच मराठी बांधवांना पाठबळ दिले आहे. त्यामुळेच सीमाबांधवांना लढण्यास प्रेरणा मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या रॅलीमध्ये राजू यादव, पोपट दांगट, प्रभाकर खांडेकर, मंजित माने, जयसिंग टिकीले, रियाज समनजी, अभिषेक देवणे, चंद्रकांत भोसले, दिलीप देसाई, सचिन पाटील, समीर देसाई, नवनाथ शेटके, यांच्या कर्नाटकचे शिवसेना पदाधिकारी बाजीराव सुतार, युवराज पाटील, अरविंद नागणुरी, सचिन गोरले, दिलीप बिलूरकर, प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, पिराजी शिंदे, विजय सावंत, अरविंद कुलकर्णी, सतीश मोरसे आदी सहभागी झाले होते.