ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यपाल कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यानंतर आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असे विधान लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात केलं. या वक्तव्यानंतर लाड यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.
काय म्हणाले लाड?
कोकण महोत्सवाच्या निमित्तानं प्रसाद लाड यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचा जन्म कोकणात झाला आहे. रायगडावर त्यांचे बालपण गेलं. स्वराज्याची शपथ महाराजांनी रायगडावर घेतल्याचे प्रसाद लाड म्हणाले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे नेते आमदार प्रविण दरेकर देखील उपस्थित होते.
वक्तव्यानंतर दिलगिरी व्यक्त
छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. महाराजांची कर्मभूमी कोकण होती, स्वराज्याची मुहूर्तमेढ कोकणात रोवली गेली हे देखील विसरून चालणार नाही. अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतु, त्वरित चूक दुरुस्त केल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. विश्वाचे आराध्य दैवत शिवरायांचा सन्मान आम्ही यापुढेही ठेवणार. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.