विद्यापीठ कुलसचिव निवड समितीचा निर्णय : विद्यापीठ प्रशासनाला पुन्हा जाहिरात काढावी लागणार
प्रतिनिधी/कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठातील कुलसचिव पदाच्या निवडीसाठी गेल्या सहा महिन्यापासून निवडप्रक्रिया सुरू होती. अखेर शनिवारी पात्र 27 उमेदवारांपैकी 17 उमेदवारांनी ही मुलाखत दिली. परंतू विद्यापीठाच्या कुलसचिव निवड समितीने यापैकी कोणाचीही निवड केलेली नाही, असा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला कुलसचिव पदासाठी पुन्हा एकदा जाहीरात काढून निवड प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी आलेल्या अर्जांच्या छाननीनंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, माजी परीक्षा संचालक महेश काकडे आणि विद्यमान उपकुलसचिव डॉ. विलास सोयम यांचे अर्ज अपात्र ठरले होते. त्यामुळे या तिन्ही उमेदवारांनी मुख्यमंत्री, राज्यपाल, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, कुलगुरू यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे कुलसचिव पदाच्या मुलाखती होण्यापुर्वीच कुलसचिव निवडीसंदर्भाम्तील वाद चव्हाट्य़ावर आला होता. परंतू कुलगुरूंनी या तिघांनाही त्रुटींची पुर्तता करीत मुलाखती देण्यास परवानगी दिली होती. शनिवार 4 जून रोजी पात्र 27 उमेदवारांपैकी 17 उमेदवारांनी कुलसचिव पदासाठी मुलाखत दिली. परंतू निवड समितीने एकाही उमेदवाराची निवड केलेली नाही. त्यामुळे विद्यापीठ वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे. परंतू विद्यापीठ कायद्यानुसार मुलाखतींमधून कोणाची निवड करायची की नाही याचे संपूर्ण अधिकार निवड समितीला आहेत. त्यामुळे निवड समितीने कुलसचिवपदी कोणाचीच निवड न करण्याचा निर्णय घेतला आहे. निवड समितीच्या निर्णयामुळे निवडीपुर्वी सुरू असलेल्या वादावर आपोआपच पडदा पडला आहे. परिणामी येत्या काही दिवसात शिवाजी विद्यापीठ प्रशासनाला कुलसचिव पदासाठी पुन्हा जाहीरात काढावी लागणार. त्यानंतर अर्जांची छाननी, निवड यादी आणि मुलाखत यात कितीवेळ जाणार माहित नाही. परंतू पुन्हा निवड प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत कुलसचिवपद प्रभारीच राहणार हे निश्चित.
यापुर्वीही कुलसचिवपदी कोणाचीही निवड केलेली नव्हती
शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू देवानंद शिंदे यांच्या कालावधीत कुलसचिव पदाच्या मुलाखती झाल्या होत्या. परंतू तत्कालीन निवड समितीनेही कुलसचिवपदी कोणाचीही निवड केलेली नव्हती. त्यानंतर पुन्हा जाहीरात काढून कुलसचिवपद भरण्यात आले होते. आता शनिवारी झालेल्या मुलाखतींमधूनही निवड समितीने पुन्हा एकदा कुलसचिवपदासाठी कोणाचीच निवड केलेली नाही.
मुलाखत दिलेल्या उमेदवारांमध्ये नाराजी
कुलसचिव पदासाठी पात्र ठरलेल्या 17 उमेदवारांनी आपली कुलसचिवपदी निवड होणार, या आशेवर जंगी तयारी करीत मुलाखत दिली होती. मुलाखतीनंतरही आपली निवड होणार या अविर्भावाने परतलेल्या उमेदवारांनी मात्र समितीच्या निर्णयानंतर नाराजी व्यक्त केली आहे.