ऑनलाईन टीम / तरुण भारत :
‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी माती विभागातून सोलापूरचा महेंद्र गायकवाड तर गादी विभागातून पुण्याचा शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली. या चुरशीच्या लढतीत शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाडला चितपट करत महाराष्ट्र केसरी किताबावर आपले नाव कोरले. शिवराजच्या विजयामुळे पुणे जिल्ह्यातील कुस्तीशौकिनांनी जल्लोष केला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्याला मानाची गदा देण्यात आली.
पुण्यात आज (शनिवार) ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला. यात शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाड याला दुहेरी पट काढून मानेवर कस चढवीत पराभवाची धूळ चारली. शिवराज राक्षे याने उपांत्य फेरीत गादी विभागातून हर्षवर्धन सदगीरवर ८-१ अशा फरकाने विजय मिळवत अंतिम स्पर्धेत धडक मारली होती. तर गायकवाड याने माती विभागातून सिकंदर शेख याला ४- ६ अशा गुणाने पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.