ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यातील काही ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज लागला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख केल्याने हे ट्विट आता चर्चेत आलं आहे. शिवसेना कोणाची, एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची हा प्रश्न अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, तरीही मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेवर आपला दावा ठोकला आहे. यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंचा पक्षप्रमुख म्हणून उल्लेख टाळला होता. आता शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट वेगळा दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी या ट्विटमधून केला आहे.
नुकताच उद्धव ठाकरेंचा वाढदिवस झाला. त्यावेळी त्यांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचा उल्लेख माजी मुख्यमंत्री असा केला. पक्षप्रमुख हा उल्लेख त्यांनी टाळला होता. त्यानंतर आता ग्रामपंचातीच्या निकालासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी शिवसेना आणि ठाकरे गट वेगवेगळे दाखवले आहेत.
एकनाथ शिंदेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती सरकारला जनतेचा कौल… शिवसेना-भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार…”
त्यासोबत त्यांनी एक पोस्टर शेअर केलं आहे. ज्यामध्ये निकालाचा उल्लेख आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती सरकारला जनतेचा कौल असं म्हणत या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा 82, शिवसेना 40, उद्धव ठाकरे गट 27, राष्ट्रवादी काँग्रेस 53, काँग्रेस 22 आणि इतरांना 47 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाल्याचं म्हटलं आहे.