ऑनलाईन टीम/तरुण भारत
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी सावरकरांविषयी (Veer Savarkar Conflict) केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. तर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानावरून भाजपानं काँग्रेस आणि त्यांच्यासह शिवसेनेवरही परखडपणे टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससोबत असणाऱ्या शिवसेनेची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न भाजपाकडून उपस्थित केला जात होता. यावर उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर आता संजय राऊतांनी (Shivsena Leader Sanjay Raut) मविआत फूट पडू (Split in Mahavikas Aghadi) शकते असं विधान केलं आहे.
दरम्यान, एकीकडे उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली असली, तरी भाजपाविरोधात सर्वपक्षीय आघाडीच्या बाजूने आपण असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या विधानानंतरही काँग्रेसशी असलेली आघाडी कायम असल्याचेच संकेत उद्धव ठाकरेंनी दिले असताना आता संजय राऊतांनी त्याच्याउलट सूचोवाच केले आहेत. या विधानामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, अशी शक्यता संजय राऊतांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
संजय राऊत म्हणाले, “राहुल गांधींनी मध्येच वीर सावरकरांचा मुद्दा आणण्याची गरज नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीतही फूट पडू शकते. मी तुम्हाला सांगून ठेवतोय. कारण वीर सावरकर हे नेहमीच आमचे श्रद्धास्थान राहिले आहेत आणि नेहमी राहतील”, असं संजय राऊत म्हणाले.”काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे आणि परखडपणे सांगितलंय की वीर सावरकरांची कोणत्याही प्रकारे बदनामी, चुकीचं वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही. शिवसेना ते सहन करणार नाही. हे सांगितल्यावर आमचा विषय संपतो”, असंही ते म्हणाले.
“राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. या देशातलं वातावरण हुकुमशाहीकडे नेणारं, देशाला गुलामगिरीच्या बेड्या ठोकणारं झालं आहे. महागाई, बेरोजगारी अशा विषयावर त्यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. असं असताना वीर सावरकरांचा विषय काढण्याचं काही कारण नव्हतं. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला नसून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. इतिहासकाळात काय घडलं आणि काय नाही घडलं यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा या मताचे आम्ही आहोत. राहुल गांधींनी त्याकडं लक्ष द्याव असं राऊत यावेळी म्हणाले. वीर सावरकारांना भाररत्न द्यावा अशी आमची मागणी आहे. सातत्यानं आम्ही ही मागणी करत आहोत. मला कळत नाही भाजपमध्ये जे नवीन सावरकर भक्त निर्माण झाले आहेत, ते सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी उचलून का धरत नाहीत? असा सवाल राऊतांनी यावेळी केला.
राहुल गांधी यांच्याविरोधात ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आपल्या देशात तक्रारी दाखलं करणं, तक्रारीच्या आधारावर प्रसिद्धी मिळवणं हा राजकीय उद्देश झालाय. वीर सावरकरांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. काल शिवसेना उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं की, वीर सवारकरांची बदनामी, चुकीचं वक्तव्य मान्य करणार नाही. सहन करणार नाही. देशात हुकुमशाहीचं वातावरण निर्माण झालं आहे. गुलामाच्या बेड्या ठोकणारं हे सरकार आहे.