ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी निर्देश दिल्यानंतर राज्यातील १ हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आलेत तर ३५ हजारांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यात आलंय. योगींच्या या निर्णयावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (raj thackeray) योगी सरकारचं अभिनंदन करत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. याच टीकेसंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रतिक्रिया दिलीय. मुंबईमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना या टीकेसंदर्भात भाष्य केलं.
खासदार संजय राऊत यांना उत्तर प्रदेशातील घडामोडी आणि त्यावर राज ठाकरेंनी दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी खोचक शब्दांमध्ये टीप्पणी केली. “आता योगी कोण आणि भोगी कोण या संदर्भात मत परिवर्तन कसे झाले हा एक संशोधनाचा विषय आहे. एखाद्याला पीएचडी करायची असेल तर त्याने करावी,” असं राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावताना म्हटलं आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
“उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्या बद्दल योगी सरकारचे मन:पुर्वक अभिनंदन आणि आभार”, असा शब्दांत राज ठाकरे यांनी योगींचे कौतुक केलं आहे. तसंच, याच पत्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे “आमच्या महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाहीत आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना”, असा शब्दांत राज ठाकरेंनी हल्लाबोल केला.