कोल्हापूर, प्रतिनिधी : कृष्णात चौगले
कोल्हापूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील शिवसैनिकांना भावनिक साद घातली आहे. सर्व जिल्हाप्रमुखांसह अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिंदे गटासोबत गेलेल्या पदाधिकाऱ्यांना वगळून शिवसेनेची नव्याने संघटनात्मक बांधणी करण्याची त्यांनी सूचना दिली आहे. त्यानुसार खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्यासह जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर समन्वयक हर्षल सुर्वे, शहरप्रमुख सुनील मोदी (उत्तर), रवि इंगवले (दक्षिण) आदी सेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा, शहरात शिवसेनेची भक्कम संघटनात्मक बांधणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या संपर्क दौऱ्य़ात त्यांना शिवसैनिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून कोल्हापूरची सेना अभेद्य असल्याची ते ग्वाही देत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत.
आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेच्या संघटनात्मक पुनर्बांधणीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रयत्नांची पराकाष्टा सुरु केली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा सुरु केली. शिवसेना शाखांना भेटी दिल्या जात आहेत. तर राज्यात ज्या मतदारसंघातील आमदारांनी बंडखोरी केली आहे अशा मतदारसंघात शिवसेनेच्या मेळाव्यांना भर पावसात हजारोंची गर्दी जमत आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आचार, विचार प्रमाण मानून जगणाऱ्या शिवसैनिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळेच सेनेसाठी झोकून देऊन काम करणारे नव्या दमाचे सैनिक संघटनेत सहभागी होत आहेत.
सेनेच्या संघटनात्मक बांधणीमध्ये जिल्हा पातळीवर जिल्हाप्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुका प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख अशी रचना आहे. युवा सेना, महिला संघटनेसह अन्य अंगिकृत संघटनेमध्येही हीच रचना पहावयास मिळते. त्यामुळे ‘मातोश्री’वरून आलेला प्रत्येक आदेश आणि सूचना तळागाळापर्यंत पोहोचण्यास वेळ लागत नाही. जिह्यात ज्या नेत्याचा स्वतःचा गट आहे, अशा नेत्यांना शिवसेनेकडून विधानसभेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्यात आली. सेनेच्या चिन्हावर काहींनी मैदान देखील जिंकले. पण आज शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर काहींनी ‘नरोवा कुंजरोवा’ अशी भूमिका घेतली आहे. खासदार प्रा. मंडलिक यांच्यासह दोन जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांसह अन्य निष्ठावंत शिवसैनिकांकडून जिल्हा पिंजून काढला जात आहे.
हेही वाचा- समस्या सुटत नसतील तर बिस्तारा बांधा, चालते व्हा..! सांगलीत नागरिक आक्रमक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यातील शिवसेनेच्या माजी आमदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. जिह्यातही काही वेगळी परिस्थिती नाही. माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजीत पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील यांनी अद्याप आम्ही शिवसेना सोडलेली नाही, अशी भूमिका घेतली असली तरी ते ‘वेट अँड वॉच’ मोडवर आहेत.
बंडखोर आमदारांकडून चाचपणी
शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर आणि अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर हातात शिवबंधन बांधलेले राजेंद्र पाटील-यड्रावकर शिंदे गटासोबत गेले आहेत. पण उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनानंतर त्यांना शिवसैनिकांतून पाठींबा मिळत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्याचा आपल्याला फटका बसेल का, याची बंडखोर आमदार चाचपणी करीत आहेत. ‘चला गद्दारांना धडा शिकवू’ या टॅगलाईनखाली जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून मोहीम हाती घेतली जाणार आहे. यामध्ये मेळावे घेऊन आणि सोशल मीडियाद्वारे बंडखोर आमदारांच्या विरोधात वातावरण निर्मिती केली जाणार आहे.
गुरु पौर्णिमेनिमित्त शेकडो शिवसैनिक जाणार मातोश्रीवर
गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी, 13 रोजी माझ्यासह जिह्यातील शेकडो शिवसैनिक मातोश्रीवर जाणार आहेत. उद्धव ठाकरेंना भेटून त्यांचे दर्शन घेऊन जिह्यातील तमाम शिवसैनिक आपल्यासोबत असल्याचा त्यांच्याकडून ठाकरे यांना शब्द दिला जाणार असल्याचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले.
हेही वाचा- Sangli; अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून प्रकरणी जन्मठेप
शुक्रवारी शिवसेनेचा व्यापक मेळावा
शिवसेनेतील बंडखोरी आणि सत्तांतर नाट्यानंतर जिह्यात शुक्रवारी, 15 रोजी शिवसेनेचा व्यापक मेळावा होणार आहे. शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना नेते दिवाकर रावतेंसह तिन्ही जिल्हाप्रमुख, दोन खासदार आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये हा मेळावा होणार आहे.