ऑनलाईन टीम/तरुण भारत
औरंगजेबचा जन्म गुजरातमध्ये झाला त्याने दिल्लीवर आक्रमण केले होते. आता त्याच गुजरातच्या मातीत जन्मलेला औरंगजेब महाराष्ट्रावर आक्रमण करू पाहतोय, आता शिवसैनिक शांत बसणार नाही महारष्ट्राच्याही तलवारी तळपतील असा हल्लाबोल संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केला. ते कोल्हापुरात शिवसंपर्क अभियान मेळाव्यात बोलत होते.
यावेqळी बोलताना राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथम कोल्हापूरला जाण्यास सांगितले. कोल्हापूरची भूमी क्रांतिक्ररक, दिलदार आणि पवित्र आहे. कोल्हापुराने शिवसेनेला भरभरून दिले आहे. सेना प्रमुखांच्या आदेशानुसार ते पुन्हा मिळवण्यासाठी मी शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी इथे आलोय असे ते यावेळी म्हणाले.
कर्नाटक सरकारकडून बेळगाव मधील मराठी भाषिकांची कोंडी करण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय. जेव्हा जेव्हा मराठी भाषिकांची कोंडी करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा शिवसैनिक पेटून उठतो, तर त्यांच्यावर अन्याय झाला तर कोल्हापुरातून कर्नाटक जाम केला जातो.
भाषण करण्याआधी काय भाषण केले जावे? याचा विचार करतो. कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाषण करण्याचा ठेका घेतला आहे. आता शिवसेना झुकणार नाही, महाराष्ट्र वाकणार नाही असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी बोलताना भाजपला दिला.
देशात भाजप सरकार विकासावर बोलायचं सोडून दुसरचं काहीतरी करत आहे. देशात लोकांचे अनेक प्रश्न आहेत. भाजपचे लोक मात्र त्या प्रश्नावर चर्चा करायला तयार नाहीत. ते फक्त टोपी, भोंगा यावर चर्चा करत आहेत. देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे महागाईवर प्रश्न विचारला तर ज्ञानव्यापीकडे लक्ष वळवले जाते. देशात ३०० पटीने महागाई वाढली आहे, पण ३०० पटीने उत्पन्न वाढले का? असा सवाल यावेळी राऊत यांनी केला.
दरम्यान, भाजप सरकारला महागाई वर विचारले तर, मशीद वर जातील, हिंदू-मुस्लिमकडे मुद्द्याकडे घेऊन जातील, शेवट पाकिस्तान कडे जातील,पण हिंमत असेल तर चीन कडे जावा, असे आव्हान राऊत यांनी भाजप सरकारला केले आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, भाजप शिवसेनेवर कारवाया करत आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगलं काम करत आहे. पण हे राज्य विस्कळीत करायचे, ते चालू द्यायचे नाही, असे भाजपचे प्रयत्न सुरु असून शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने त्यांचे उपद्व्याप सुरू आहेत, पण आमच्या नादाला लागू नका शिवसेना तुम्हाला पुरून उरेल, असा इशारा यावेळी राऊत यांनी दिला.
शिवसेना कशी आहे? बाळासाहेब ठाकरे कसे होते? उद्धव ठाकरे कसे आहेत? ते माहिती आहे. एका सामान्य कार्याकर्त्याला अलगद उचलून दिल्लीत नेऊन ठेवला, हे एका कार्यकर्त्याचा सन्मान आहे आणि हे फक्त शिवसेनाच करू शकते असे राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेला बदनाम करण्याचा देवेंद्र फडणवीस आणि कंपनीने सुरू केला त्यांचा मुखवटा शाहू महाराजांनी फाडला, कोल्हापूरच्या भूमीमध्ये अजूनही सत्य आणि प्रमाणीकपणा आहे असे संजय राऊत म्हणाले. शाहू महाराजांंच्या घराण्याने सचोटी धरून ठेवली आहे, असे राऊत म्हणाले. तसेच राऊतांनी सांगितले की, शाहू महाराज मनानं मी आजही शिवसैनिक आहे, असे म्हणाले. शाहू महाराजांचं वक्तव्य आंबाबाईने दिलेला आशिर्वाद आहे आणि त्यासाठी आम्ही त्यासाठी आभारी आहोत, असे राऊत म्हणाले.
तसेच भाजपने कारस्थान केलं, समाजात तेढ निर्माण करण्यासाठी संभीजीराजेंचा गैरवापर केला पण शाहू महाराजांनी त्यांचा मुखवटा फाडला असे राऊत यावेळी म्हणाले. तसेच शिवसेनेने छत्रपती घराण्याचा अपमान केला नाही, नेहमी सन्मान केला आहे. मी आजही मनापासून शिवसैनिक आहे, असे शाहू महाराज म्हणाले आहेत. त्यावरून बोध घेऊन भाजपने शहाणे व्हावे, काल पर्यंत भाजप शिवसेनेची कोंडी झाली म्हणत होते. पण आता कोंडी तुमची झाली आहे, असा टोला यावेळी राऊत यांनी भाजप नेत्यांना लगावला.
भाजप सर्वांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. पण सर्वात भ्रष्ट भाजप आहे, त्यांचा तिजोरीत सर्वात जास्त पैसे आहेत. अधिकृतपणे त्यांच्या तिजोरीत साडेपाच हजार कोटी आहेत, हा पैसा उद्योजकांनी दिला आहे, असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला.
राज्यात सेना नेत्यांवर कारवाई सुरु आहे. पण एक लक्षत ठेवा आमच्या अंगावर आला तर शिवसेना सोडणार नाही, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत तुम्हाला पुरून उरू असा गंभीर इशाराही यावेळी राऊत यांनी दिला.
आमचे गेले ते परत मिळवणार, आघाडी बिघाडी नंतर बघू, आता लक्ष कोल्हापूर महापालिका निवडणुकांमध्ये लक्ष घाला. आता पक्षाचे तीन खासदार आहेत, त्यामुळे चार नगरसेवकांवर थांबून चालणार नाही. आमच्या शिवाय महापौर होऊ देणार नाही, असे ते यावेळी म्हणाले.
राज्यात उद्धव ठाकरे सरकार पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करेल. पुढचे पाच वर्षे देखील आमचेच सरकार असेल त्यामुळे २०२४ ला दिल्लीत चमत्कार दिसेल, आम्ही केंद्रात दिसेन असे राऊत यावेळी म्हणाले.