ऑनलाईन टीम / तरुण भारत :
निवडणूक आयोगाने गोठवलेलं शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कायम वापरता यावं, यासाठी शिवसेना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. यासंदर्भात ठाकरे गट कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना कोणाची? हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. पुढे सर्वोच्च न्यायालयाने हा चेंडू निवडणूक आयोगाकडे टोलवला. निवडणूक आयोगाने शिवसेना कोणाच्याही पारडय़ात टाकली नाही. शिवसेनेचं धनुष्यबान हे पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात गोठवलं.
अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे चिन्ह गोठवण्यात आल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तसेच केवळ शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाही. त्यातही बदल करावा लागणार आहे. त्यामुळे निवडणूक चिन्ह कायम ठेवण्यासाठी शिवसेना पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे समजते.
अधिक वाचा : आता नव्या नावावरही दोन्ही गटाचा दावा, पेच निर्माण होण्याची शक्यता
न्यायालयीन हस्तक्षेपाची व्याप्ती कमी असल्याने निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान दिले जाऊ शकते. त्यामुळे शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा सुरू आहे.