पुणे / प्रतिनिधी :
आमचीच शिवसेना खरी असल्याचे आयोगाने सांगितल्याने आम्ही विधिमंडळाचे कार्यालय ताब्यात घेतले. मात्र कुणाच्या कोणत्याही मालमत्तेवर, प्रॉपर्टीवर आम्ही दावा करणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री शिंदे हे कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने पुण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला निवडणूक आयोगाने बहाल केल्यानंतर आता शिवसेना भवन आणि पक्षाच्या मालमत्तेबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री म्हणाले, निवडणूक आयोगाचा निर्णय मेरीटवर झाला आहे. त्यावर आक्षेप घेणे चूक आहे. आता आमचीच शिवसेना खरी असल्यावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे विधिमंडळ कार्यालय ताब्यात घेतले. परंतु, आपण बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे शिवसेना भवन वा अन्य कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नाही. याबाबतची चर्चा चुकीची आहे.
अधिक वाचा : पुण्यात सतरंजीमुळे वाचले तरुणीचे प्राण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसब्यात आज भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा प्रचार करीत मेळाव्यास उपस्थिती लावली. कसबा पेठेतील अनेक समाजाचे लोक मला येऊन भेटले. तेली समाज, मराठा समाज, सोनार समाज , ब्राम्हण समाज असे अनेक समाजाचे लोक येऊन भेटले. कसब्यातील जुन्या वाड्यांचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न असे अनेक प्रश्न त्यांनी मांडले. भाजपवर ब्राह्मण समाज नाराज नसल्याचे त्यांनी म्हटले. नाराजी असल्याचे विरोधकांकडून पसरवले जात असून हा मतदारसंघ युतीचा बालेकिल्ला आहे. कुणाला निवडून आणायचे, हे मतदार ठरवत असतात. युती सरकार ज्या धडाडीने निर्णय घेत आहे, ते पाहता हे सरकार चांगले काम करत असल्याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.