ऑनलाईन टीम / तरुण भारत :
एकनाथ शिंदे यांच्यासह 39 आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेची पूर्णपणे वाताहत झाली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदेंसोबत जुळवून घ्यावे, अशी विनंती शिवसेनेच्या खासदारांच्या गटाने काल सायंकाळी झालेल्या बैठकीत केली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी या विनंतीला केराची टोपली दाखवत एकनाथ शिंदे यांनाच गटनेतेपदावरून हटवले. त्यानंतर शिवसेनेच्या 19 खासदारांपैकी 12 खासदार वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजपच्या एका केंद्रीय नेत्याने केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी काल सायंकाळी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. बंडखोर आमदार सेनेत आले नाहीत, तर निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे शिंदेंच्या नेतृत्त्वातील बंडखोर आमदारांना पक्षात सामील करुन घेण्याबाबतची विनंती उद्धव ठाकरेंकडे करण्यात आली. मात्र, उद्धव ठाकरेंनी ही विनंती मान्य केली नाही. उलट एकनाथ शिंदे यांच्यावरच कारवाई केली. शिंदेंना गटनेतेपदावरुन हटविण्यात आले. त्यामुळे ठाकरे हे शिंदे गटाशी जुळवून घेणार नसल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर शिवसेनेच्या 12 खासदारांचा एक गट शिंदे यांच्या संपर्कात असून, तो वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहे, असा दावा भाजपच्या एका केंद्रीय नेत्याने केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा यासंदर्भातील चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, काल झालेल्या खासदारांच्या या बैठकीला एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, राजन विचारे आणि भावना गवळी हे तीन खासदार गैरहजर होते. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या वडिलांना पाठिंबा दिला आहे. तर राजन विचारे हे ठाण्यातील खासदार असल्याने ते शिंदे यांना मानणारे आहेत. भावना गवळी या यवतमाळच्या खासदार असून, त्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बंडखोरांनी हिंदुत्त्वाबाबत जी भूमिका घेतली, त्यावर विचार करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे या तीन खासदारांसोबत आणखी 9 खासदार कोणते? तसेच ते कोणती वेगळी भूमिका घेणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.