औरंगाबाद, पुणे / प्रतिनिधी :
मराठवाड्यातील शिवसेनेचे शक्तिशाली नेते अर्जुन खोतकर व भाजपा नेते व जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्यात दिल्ली भेटीनंतर समेट घडून आल्याचे वृत्त आहे. दानवे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या खोतकर यांनी केंदीय यंत्रणेच्या कचाटय़ात अडकल्यानंतर तडजोडीची भूमिका घेतली असल्याचे त्यांच्या विधानांवरून दिसत असून, ते आता आपली तलवार म्यान करणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. दरम्यान, खोतकर यांच्याकरिता दानवे यांची जागा सोडून भाजप आणखी एक पाऊल मागे घेणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
रावसाहेब दानवे व अर्जुन खोतकर या दोघांमध्ये छत्तीसचा आकडा आहे. मागील लोकसभा निवडणुकीत खोतकर यांनी जालन्यातून दानवे यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता. त्यामुळे दानवे हे अडचणीत आले होते. दोन्ही पक्षांची युती असली, तरी जालन्यातील लढत मैत्रिपूर्ण होऊ दे, अशी खोतकर यांची भूमिका होती. युती तुटल्यानंतरच्या काळात दानवे यांनी मातोश्रीविरोधात विधाने केली होती. तेव्हापासून खोतकर यांनी दानवे यांचा पराभव करणारच, असा विडा उचलला होता. मात्र, मातोश्रीतून सबुरीचे धोरण घेण्याचे आदेश आल्यानंतर खोतकर यांचे बंड थंड झाले होते.
वास्तविक या दोघांमधील वैर हे जुने आहे. या ना त्या माध्यमातून त्यांच्यात सातत्याने वाद झाल्याची उदाहरणे आहेत. जालना बाजार समितीच्या निवडणुकीत संचालकपदाच्या जास्त जागा भाजपने मागितल्या होत्या. त्या देण्यावरून खोतकर आणि दानवे यांच्यात वाद झाला होता. शेवटी तीन जागा शिवसेनेने भाजपला देतानाच रावसाहेब दानवे यांचे चुलतबंधू भास्कर दानवे यांना उपसभापतीपद दिले. हा वाद मिटतो न मिटतो तोच 2016 मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यात भाजपला सर्वाधिक 22, तर शिवसेनेला 15 जागा मिळाल्या. त्यावेळी भाजपसोबत युती करून जिल्हा परिषद युतीच्या ताब्यात ठेवावी, असा आग्रह दानवे यांनी धरला. तो अर्जुन खोतकर यांनी फेटाळून लावला होता.
राष्ट्रवादीशी खोतकरांनी केली होती आघाडी
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान साधून जिल्हा परिषदेत चुलत भाऊ अनिरुद्ध खोतकर यांना त्यांनी अध्यक्षपदी विराजमान केले. तसेच उपाध्यक्षपदही राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सतीश टोपे यांच्याकडे दिल्याने दानवे आणि खोतकर यांच्यामधील दरी वाढत गेली.
दानवेंशी समेट घडल्याने आश्चर्य व्यक्त
त्यातच लोकसभा निवडणुकीला एक वर्ष शिल्लक असतानाच खोतकर यांनी दानवे यांच्याशी दोन हात करण्याचा निर्णय जाहीर केल्यावर तर दानवे-खोतकर हा वाद आणखी गडद होत गेला. लोकसभेत खोतकर हे दानवे यांना जड जातील, असेही वातावरण होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी माघार घेण्यास सांगितल्याने खोतकर यांनी एक पाऊल मागे घेतले. तेच खोतकर हे दानवे यांच्याशी तडजोड करण्यास तयार झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खोतकर यांनी संकट मोठे आहे. सेफ राहण्यासाठी तडजोड करावी लागते, असे सांगत एकप्रकारे आपली आगतिकताच व्यक्त केल्याचे मानले जात आहे.
जालन्याची जागा की आणखी काय?
खोतकर यांच्यामागेही केंद्रीय यंत्रणेचा ससेमिरा आहे. तो चुकविण्यासाठी त्यांनी दिल्लीची वाट धरल्याची चर्चा आहे. ते शिंदे गटात आल्यास त्यांना जालन्याची जागा मिळणार काय किंवा दुसरे काय मिळेल, याविषयीही तर्कवितर्क लढविले जात आहेत. अर्थात खोतकर यांच्याकरिताही हा चक्रव्यूहच असेल. दानवेंशी ते किती दिवस पटवून घेऊ शकतील, याविषयीही साशंकता व्यक्त होत आहे.
डेंजर झोनची जागा सेफ करण्याची खेळी
2024 ला लोकसभेची निवडणूक होत आहे. भाजपासाठी प्रत्येक जागा महत्त्वाची असून, त्याची बांधणी आत्तापासून केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून डेंजर झोनमधील जागा सेफ करण्याची खेळी करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : रावसाहेब दानवे धोकेबाज राजकारणी; खोतकरांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर खैरेंचा निशाणा