पुणे / प्रतिनिधी :
शिवसेनेचे हिंदुत्व वैदिक वा चातुर्वण्य मानणारे नाही. त्यामुळे ते आम्हाला मान्य आहे, अशी भूमिका वंचित बहुजन समाज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी घेतली आहे.
पुण्यात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आंबेडकर म्हणाले, ठाकरे कुटुंब आणि आंबेडकर कुटुंब यांच्यात तीन पिढय़ांपासून संबंध आहेत. उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अनेक उपक्रमांमधे सहभागी झाले होते. प्रबोधन ठाकरे यांनी सुद्धा मनस्मृतीचा निषेध केला होता. बाळासाहेबांच्या काळापासून ते आत्तापर्यंत शिवसेनेने कधीही मनस्मृतीचे समर्थन केलेले नाही. त्यामुळे आम्ही शिवसेना किंवा काँग्रेससोबत युती करण्यास तयार आहोत. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही. बऱ्याच वर्षांनी सर्वच राजकीय पक्षांना समजुतीच्या राजकारणाची जाणीव झाली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
अधिक वाचा : आता पॉलिटेक्निकची परीक्षाही मराठीतून
अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेच काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच डाव्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. पण खरा प्रश्न हा आहे की उद्धव ठाकरेंनी हा पाठिंबा मागितला होता का? हा पाठिंबा न मागता इतर पक्षांनी तो दिला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना ब्लॉक करावे लागेल, असे मत त्यांनी नोंदवले.
उद्धव ठाकरे आघाडीतून बाहेर पडू शकतात…
सध्या शिवसेना ही महाविकास आघाडीसोबत राहील का, याबाबत माझ्या मनात शंका आहे. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडून ‘एकला चलो रे’ची भूमिका घेऊ शकतात. कारण त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे, अशी शक्यताही आंबेडकर यांनी वर्तविली.
साईबाबांनी बोलण्याचे धाडस दाखवावे
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना आंबेडकर म्हणाले, आता साईबाबा यांनी पुढे येऊन बोलण्याचे धाडस दाखवले पाहिजे. एल्गार परिषद प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी कोणीही एकजण पुढे आला, तर त्याचा खटला चालवण्यास मी तयार आहे, असेही ऍड. आंबेडकर यांनी सांगितले.