जपानचे 67 वषीय माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर जपानमधील नारा शहरातील एका कार्यक्रमात भाषण करत असताना गोळीबार झाला. काही तासातच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. ही बाब खरोखरच धक्कादायक अशी मानावी लागेल. भारत आणि जपानचे संबंध दृढ करण्यामध्ये शिंजो आबे यांचा सिंहाचा वाटा होता.शिंजो आबे यांना सार्वजनिक सेवेच्या क्षेत्रात त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी 2021 मध्ये भारताकडून पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जपानमध्ये आर्थिक सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. जपानला भारताचा विश्वासार्ह मित्र आणि आर्थिक सहयोगी बनवण्यात जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यकाळातच भारतासोबत मुक्त आणि मुक्त इंडो-पॅसिफिक निर्माण करण्यासाठी करार करण्यात आला होता. त्या प्रित्यर्थ भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले होते. जपानचे सर्वात तरुण पंतप्रधान आणि सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर विराजमान झालेले व्यक्तिमत्त्व म्हणून जगभर त्यांची ख्याती होती. जागतिक शांततेसाठी प्रयत्न करण्याबरोबरच आपल्या देशामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांनी उचललेली विविध पाऊले जपानला यशाच्या दिशेने अधिक पुढे घेऊन गेली. आपल्या कार्यकाळात ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप मजबूत करण्याबरोबरच युरोपीय महासंघासोबत यशस्वी व्यापारी करार, चीनबरोबर अनेक आर्थिक आणि विकास करारांवर चर्चा, चीनशी विविध बाबतीत असलेल्या तंटय़ानंतरही व्यापार संधीचे रस्ते बंद होणार नाहीत याची काळजी घेऊन केलेली वाटचाल, आर्थिक व्यवस्थापन, वित्तीय आणि रचनात्मक धोरणांमध्ये बदल घडवून आपल्या देशाची मुद्रा अधिक कणखर करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 2005 साली मंत्री, 06 साली पंतप्रधान ही त्यांची थक्क करणारी वाटचाल होती. 2007 सालापासून त्यांनी भारताचे अनेकदा दौरे केले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात झालेल्या त्यांचा दौरा, 2014 च्या प्रजासत्ताक दिनाचे ते प्रमुख पाहुणे असणे याला भारत आणि जपान या दोन समुद्रांचा मिलाफ या नावाने गौरवले गेले. पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात त्यांनी भारताशी अधिक दृढ नाते निर्माण केले. मोदी यांच्या स्वागताकरिता जपानमध्ये आपल्या पिढीजात घरी त्यांनी मेजवानीचे आयोजन केले. जपानमध्ये एखाद्या विदेशी पाहुण्याचा प्रथमच असा सन्मान करण्यात आला होता. 2015 साली त्याच्याही पुढचे पाऊल टाकत भारताने त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात म्हणजे काशी शहरात निमंत्रित केले. गंगेच्या काठावर झालेल्या त्या समारंभाची खूप चर्चा झाली. याच ठिकाणी द्विपक्षीय बैठकीतून काशी क्योटो करार पुढे आला. काशीला भागीदार शहराचा दर्जा देऊन क्मयोटो शहराप्रमाणे विकसित करण्याचा मनोदय त्यात व्यक्त करण्यात आला. मुंबई ते अहमदाबाद बुलेट टेन ही शिंजो आबे यांनी गुजरात आणि महाराष्ट्राला दिलेली एक वेगळी भेट होती. हा प्रकल्प अद्याप अपूर्ण अवस्थेत असला तरी त्यासाठी अल्प दराने दिलेले कर्ज हा कौतुकाचा आणि आरोपाचाही विषय झाला होता. आतापर्यंत राजकीय कारणांमुळे प्रकटलेला हा प्रकल्प भविष्यात मार्गी लागेल. मात्र अहमदाबादच्या कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपूजन अहमदाबादला केले मात्र उद्घाटन करायला शिंजो आबे यांनी मुंबईला यावे असे दिलेले निमंत्रण आता इतिहास बनून राहिले आहे. जपानच्या माजी पंतप्रधानाचा नातू आणि माजी अर्थमंत्र्याचा मुलगा अशी ओळख असलेल्या शिंजो आबे यांना जपानमध्ये प्रिन्स या टोपण नावाने ओळखले जात होते. जपान आणि भारत या दोन राष्ट्रांमध्ये चीनचे आव्हान हा एक प्रमुख मुद्दा होता. महायुद्धामध्ये झालेले जपानचे नुकसान आणि त्यानंतर त्या देशाने घेतलेली उसळी हा भारतामध्ये नेहमीच कौतुकाचा विषय आहे. त्यामुळे एखादा जपानी नेता आपल्या देशात येतो तेव्हा त्याच्याकडे भारतीयांच्या नजरा लागलेल्या असतात. दोन्ही राष्ट्रे तेल संपन्न नसल्याने त्यांना नेहमीच इतर राष्ट्रांच्या व्यवहारांवर अवलंबून राहावे लागते. त्यातही जपान सारख्या देशात तर तेलाचे साठेच सापडत नसताना शंभर पेक्षाही ज्यादा ऍव्हरेज देणाऱया गाडय़ा निर्माण करणारा देश म्हणून जपानकडे पाहिले जायचे. अणुऊर्जेच्या क्षेत्रात भविष्यात ही दोन राष्ट्रे हातात हात घालून चालतील अशी आशा आहे. जेव्हा जेव्हा भारत आणि जपान द्विराष्ट्रीय संबंधांची चर्चा होत राहील तेव्हा तेव्हा शिंजो आबे यांच्या भारत मैत्रीचा आवर्जून उल्लेख होत राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकपर ट्विटमध्ये शिंजो आबे एक जागतिक नेते, उत्तम प्रशासक होते. त्यांनी आपले आयुष्य जपान आणि जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी समर्पित केले होते. ते आपल्या जवळच्या मित्रांपैकी एक होते, त्यांच्या निधनाने अतिव दुःख झाले अशी भावना व्यक्त केली आहे. भारतात दुखवटाही पाळला जाणार आहे. भारत आणि जपान यांना जोडणारा बुद्ध हा एक आणखी महत्त्वाचा धागा. शांतता आणि सत्याला सामोरे जाणे हे दुःखमुक्तीच्या बुद्ध विचाराचे सारच. पण हाच विचार देणाऱया देशातील माजी पंतप्रधानाचा अस्त बंदुकीच्या दोन गोळय़ांनी केला. त्यांना का मारले? याचा खुलासा नजीकच्या काळात होईलच. पण आजारपणामुळे पंतप्रधानपद सोडून देण्यापूर्वी चीनविरोधी सदस्य राष्ट्रांमध्ये नौदल क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी क्वाड या संघटनेचे पुनरुज्जीवन केले. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान या चार देशांची संघटना प्रशांत महासागरात स्वतंत्र मुक्त सर्वसमावेशकता राखण्यासाठी एक झाली. त्यांना अपेक्षित यश अद्याप प्राप्त झाले नसले तरी शिंजो आबे एक सुरुवात करुन गेले आहेत. त्यांना श्रध्दांजली.
Previous Articleकालिदासाचे मेघदूत…एक खंडकाव्य (24)
Next Article स्टार्टअप कंपन्यांनी तिमाहीत 6.9 अब्ज डॉलर्स उभारले
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.