ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अझरबैजानच्या बाकू शहरात सुरू असलेल्या ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताच्या आशी चौकसे आणि स्वप्नील कुसाळे यांनी मिश्र 50 मीटर रायफल थ्रीपी स्पर्धेच्या अंतिम फेरीत युक्रेनच्या सेर्ही कुलिश आणि डारिया तिखोवा यांचा 16-12 असा पराभव केला. बाकू नेमबाजी विश्वचषकात भारताचं हे दुसरं सुवर्णपदक ठरलं. यापूर्वी इलावेनिल वालारिवन, श्रेया अग्रवाल आणि रमिता या तिघांनी 10 मीटर एअर रायफल महिला सांघिक गटात सुवर्णपदक जिंकलं आहे.
पोलंडला या स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. माजी अग्रमानांकित व्हालारिवान, रमिता आणि श्रेया यांनी सोमवारी दोन टप्प्यांच्या पात्रता फेरीतून अंतिम फेरीत धडक मारली होती.
आंतरराष्ट्रीय नेमबाज असलेला स्वप्नील कुसाळे हा राधानगरी तालुक्यातील काळंबवाडीचा सुपूत्र आहे. त्याने नेमबाजीत गुरुवारी वैयक्तिक गटात तर शुक्रवारी सांघिक गटातही सलग दोन रौप्यपदक जिंकली आहेत. या कामगिरीचा स्वप्नीलला 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता फेरीमधील निवडीसाठी मोठा फायदा होणार आहे. स्वप्नील सध्या पुण्यात रेल्वेमध्ये टीसी म्हणून कार्यरत आहे.