ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे हे आता कुणा एकाचे राहिलेले नाही. पुणे हे मिनी इंडिया आहे. शहराच्या नामांतरावरून मूळ पुणेकरांना काय वाटेल, याचा विचार करायला हवा. उगाच बाहेरच्यांनी सल्ले देणे अडचणीचे ठरते. सगळीच नावे चांगली आहेत. पुणे हे नाव जगाच्या कानाकोऱ्यात पोहोचलेले आहे. सामंजस्याने भूमिका घेतली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडली.
पुणे शहराचे नाव बदलून जिजाऊ नगर करावे अशी मागणी केली जात आहे. त्याबद्दल अजित पवार यांना माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले, सध्या राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी यासारखे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न बाजूला करून वेगळे मुद्दे काढले जातात. सध्या शांततेने सगळय़ा गोष्टी चालल्या आहेत. पुण्याच्या नामांतराचे प्रस्ताव पुढे येत आहेत. त्यावर बोलणे आमच्या सारख्या राजकीय नेत्याला अवघड होते. नामकरणाच्या प्रश्नावर सगळे मिळून चर्चा करून, विश्वासात घेवून निर्णय अपेक्षित आहे. पुणे हे आता कुणा एकाचे राहिलेले नाही. मूळ पुणेकरांची काय अपेक्षा आहे हे ही तपासले पाहिजे.
पुणे मिनी इंडिया आहे. मग मूळ पुणेकरांना काय वाटते, याचा ही विचार करावा लागेल. उगीच बाहेरच्यांनी सल्ला द्यायला सुरुवात केली तर अडचणीचे ठरते. पिंपरी-चिंचवडला ही पुण्याचाच भाग समजले जाते. महत्वाचे विषय बाजूला ठेवायचे आणि बाकी विषय भरकटवायचे, याबाबत सगळय़ांनी सामंजस्याने भूमिका घेतली पाहिजे.