शुक्रवारी अलारवाड क्रॉसकडून कामाला सुरुवात : शेतकऱयांनी घेतली जिल्हाधिकाऱयांची भेट
प्रतिनिधी /बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम बेकायदेशीररित्या सुरू केल्याचा आरोप केला जात आहे. न्यायालयाने या कामाला स्थगिती दिली होती. त्यानंतरदेखील मच्छेकडून या रस्त्याचे काम सुरू होते. गुरुवारी न्यायालयाने याप्रकरणी अधिकाऱयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. असे असताना अलारवाड क्रॉसपासून शुक्रवारी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. यामुळे शेतकऱयांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची शेतकऱयांनी शुक्रवारी भेट घेतली. त्यावेळी त्यांना न्यायालयाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीची प्रत तसेच न्यायालयात असलेल्या खटल्यासंदर्भातील कागदपत्रे दिली आहेत. तरीदेखील हे काम सुरूच ठेवण्यात आले आहे. हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरूच असून आता अलारवाड क्रॉसपासून सपाटीकरण करण्यात आले असून या ठिकाणी पोलीस फौजफाटा तैनात केला आहे. शेतकऱयांनी विरोध केला असतानाही काम सुरूच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱयांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
न्यायालयाची स्थगिती असताना पुन्हा मच्छे गावाकडून हा रस्ता करण्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. उभ्या ऊस पिकांतून जेसीबी फिरविण्यास सुरुवात केली होती. सध्या येळ्ळूर रस्त्यापर्यंत सपाटीकरण करण्यात आले आहे. बेंगळूर येथील न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तरीदेखील हे काम सुरूच ठेवण्यात आले आहे. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शेतकऱयांना देशोधडीला लावण्याचा प्रकार
न्यायालयाने या रस्त्याच्या कामाला स्थगिती दिली आहे. त्याबाबत आदेश दिले आहेत. याचबरोबर खटलाही दाखल झाला आहे. त्या खटल्यावर न्यायालयात सुनावणीच झाली नाही तर निकाल कोठून लागला? असे सांगून शेतकऱयांनी अधिकारी व कंत्राटदाराला धारेवर धरले होते. तरीही या रस्त्याचे काम सुरूच ठेवले. त्याला शेतकऱयांनी विरोध केला असता त्यांना ताब्यात घेऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात केली होती. आता युद्धपातळीवर हे काम सुरू आहे. एकूणच शेतकऱयांना देशोधडीला लावण्याचा प्रकार असल्याचा आरोप होत आहे.
बेकायदेशीररित्या दडपशाही करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ता केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. एक वर्षापूर्वीदेखील अशाप्रकारे शेतकऱयांवर दडपशाही करत रस्ता करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी मच्छे येथे उभ्या ऊस पिकांतून जेसीबी फिरविण्यात आला. त्यामुळे शेतकऱयाच्या एका मुलाने अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेतले होते तर आणखी एका मुलाने झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. इतकी गंभीर घटना घडूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करून रस्ताकामाला सुरुवात केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.