गवाणे, मलपणसह अनेक भागात खांब तुटून वीजपुरवठा खंडित; झाडे कोसळल्याने रस्ते काही काळ बंद
प्रतिनिधी/ वाळपई
सकाळपासून वातावरणातील उष्णतेत वाढ झाली होती. यामुळे संध्याकाळच्या वेळेला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. अपेक्षेप्रमाणे सत्तरी तालुक्याच्या अनेक गावांमध्ये दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाऊस पडण्याचा प्रकार घडला. यावेळी मोठ्या प्रमाणात वादळी वारा झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. खोतोडा पंचायत क्षेत्रातील गवाणे भागामध्ये अनेक विजेचे खांब तुटून पडल्यामुळे वीज खात्याची मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेली आहे तर सदर भागातील वीजपुरवठा खंडित झालेला आहे.
गोवा हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वाळपई, ठाणे, नगरगाव होंडा, खोतोडा, खडकी आदी भागात पाऊस पडला. यामुळे वाळपईसह ठाणे नगरगाव आदी भागातील विविध पुरवठा खंडित झाला. संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा पूर्वपदावर आला.
वीजवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता अशी माहिती वाळपई वीज कार्यालयाचे सहाय्यक अभियंता दीपक गावस यांनी प्रस्तुत प्रतींशी बोलताना दिली. मात्र युद्धपातळीवर दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत केल्याचे त्यांनी सांगितले.
झाडे रस्त्यावर कोसळून वाहतूक बंद
खोतोडा पंचायत क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांवर वादळी वाऱ्यासह रस्त्यावर झाडे पडल्यामुळे रस्ता बंद होण्याचा प्रकार घडला. वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेत तातडीने सदर ठिकाणी धाव घेऊन रस्ता मोकळा करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. एकूण तीन ठिकाणी झाडे पडले होती. यामुळे रस्ता बंद झाला होता. सध्या रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत झालेला आहे. यामुळे कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, अशी माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली.
वीज खात्याला फटका खोतोडा गवाणे भागात वादळी वाऱ्याचा वीज खात्यालाही फटका बसला. यामध्ये वीजवाहिन्यांवर झाडे कोसळल्यामुळे खांब तुटून पडण्याचे प्रकार घडले. यामुळे खोतोडा गवाणे मलपण, सुऊंगली, शेळपे या भागामध्ये वीजपुरवठा खंडित झालेला आहे. याची माहिती मिळताच वाळपई वीज खात्याचे सहाय्यक अभियंता दीपक गावस यांनी इतर अधिकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दुऊस्तीकाम हाती घेतले. रात्री उशिरापर्यंत सदर काम सुरू राहणार आहे. रात्री उशिरापर्यंत सदर भागातील वीजपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता दीपक गावस यांनी व्यक्त केली.