दोन वर्षांच्या खंडानंतर जनतेला मिळणार संधी : ठिकठिकाणी लागले विक्रेत्यांचे स्टॉल
प्रतिनिधी / बेळगाव
श्रावणाच्या आगमनासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले आहे. कोरोनाने गेल्या दोन श्रावणातील व्रतवैकल्यांवर, सण-वारांवर विरजण घातले होते. त्यामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर श्रावण साजरा करण्याची संधी मिळाल्याने बेळगावकरांमध्ये उत्साह आहे. महिलावर्गामध्ये श्रावणाच्या तयारीची लगबग सुरू आहे.
श्रावण सोमवार आणि श्रावण शुक्रवार हे त्यातही विशेष दिवस मानले जातात. सोमवारी शंकराची तर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा केली जाते. अर्थातच त्यासाठी घरांमध्ये स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आली आहेत. दरम्यान, श्रावणातील विविध पूजांमुळे फळा-फुलांची आवश्यकता लक्षात घेऊन विपेत्यांनी ठिकठिकाणी स्टॉल मांडल्याचे पाहायला मिळत आहे.
शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेसह उपनगरांमध्येही फळा-फुलांची विक्री तेजीत आहे. पांढरी व पिवळी शेवंती, गुलाब व प्रामुख्याने केवडा बाजारात दाखल झाला आहे. केवडा काढणे कठीण असते. त्यामुळे अन्य फुलांच्या तुलनेत केवडय़ाची किंमत 75 पासून 200 रुपयांपर्यंत आहे. फळ विक्रीला तर चांगलेच दिवस आले आहेत.
गल्लोगल्ली व सर्वत्रच सफरचंद, सीताफळ, पेरू, पपई आणि केळी यांची आवक अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर धूप, उदबत्ती यासह पूजा साहित्याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसून आली. लक्ष्मीच्या पूजेसाठी लक्ष्मीचे मुखवटे, लक्ष्मीचे वस्त्र म्हणजेच साडी, कृत्रिम दागदागिने यांची खरेदीही सुरू आहे.