वैजनाथ मंदिर जागृत शिवालय
शट्टुप्पा काकतकर/कुदेमनी
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिनोळीपासून अवघ्या तीन-चार कि. मी. वर प्राचीन वैजनाथ मंदिर आहे. हे संपूर्ण मंदिर हेमाडपंथी असून, शके 1273 ते 1290 या दरम्यान मंदिराची स्थापना झाली असावी, असे जाणकारांचे मत आहे. शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेल्या वैजनाथ मंदिरात शिवलिंग असून बेळगाव परिसरातील जागृत शिवालय म्हणून या मंदिराची ओळख आहे.
देवरवाडी या छोटय़ाशा गावाला लागून डोंगरामध्ये वैजनाथ शिवालय आहे. हा संपूर्ण परिसर जंगलाने व्यापला असून, अनेक औषधी वनस्पती परिसरात आढळतात. रामदेवराव यादव यांच्या राजदरबारातील मंत्रि हेमाद्रीपंत यांच्याकरवी अनेक मंदिरे बांधण्यात आल्याची आख्यायिका आहे.
चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी शिव-पार्वतीचा विवाह सोहळा होतो. या दिवशी पारंपरिक पद्धतीने कडोली येथील पालखी वाजत गाजत मंदिरात येते. कडोली, आंबेवाडी, गोजगे, उचगाव, बसुर्ते, कोनेवाडी या गावच्या सीमा ओलांडून शिवारातून पळवत नेत पालखीची प्रदक्षिणा होते. रात्री 12.30 वा. विवाह सोहळा होतो. लग्न सोहळय़ात देवरवाडी येथील जाधव घराण्यातील परंपरागत जोतिबाची सासनकाठी मंदिरात आणतात. या दिवशी मंदिरात मोठी यात्रा भरते.
श्रावणात 25 क्विंटल तांदळाचा महाप्रसाद
मंदिरात चैत्र पौर्णिमा, महाशिवरात्र व श्रावण सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रम साजरे होतात. प्रत्येक श्रावण सोमवारी लाखोंच्या संख्येने भाविक डोंगरावर उपस्थित असतात. चौथ्या श्रावण सोमवारी तब्बल 15 क्विंटल तांदळाचा महाप्रसाद केला जातो. मागील 106 वर्षांपासून वसंत पंचमी साजरी होत आहे.
लोकवर्गणीतून मंदिराचा विकास
मंदिर परिसरात करण्यात आलेला विकास हा भाविकांनी दिलेल्या देणगीतून झाला आहे. कोरोना काळात सरकारकडून एकही रुपयाची मदत नसताना समितीने मंदिर सांभाळले.
ऍटलास कंपनीने महिलांसाठी 4 तर पुरुषांसाठी 4 स्वच्छतागृहे बांधून दिली. बेळगाव येथील आनंद अकनोजी यांनी अंदाजे 2 लाख रुपये खर्च करून मंदिराचे वॉटरप्रुफींग तर गावडोजी यांनी 2 लाख रुपये खर्च करून ग्रील बसविले. दिवाबत्तीसाठी दिल्या जाणाऱया देणगीतून धर्मशाळेची दुरुस्ती व पार्किंगच्या ठिकाणी पेव्हर्स बसविले आहेत. हायमास्ट, सीसीटीव्ही यासह इतर व्यवस्था केल्या आहेत.
मंदिराला निधीची गरज
वैजनाथ मंदिर परिसर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत येते. त्यामुळे देणगी या समितीकडे जमा होते. पाच वर्षांसाठी 11 जणांची लोकल कमिटी स्थापन केली असून, त्यावर या समितीचे नियंत्रण असते. या समितीने यात्रीनिवास व मंदिराच्या सुशोभिकरणासाठी 8 कोटी रुपयांचा प्रस्ताव देवस्थान कमिटीकडे दिला होता. यापैकी 3 कोटी रुपये निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले असले तरी अद्याप तो मंदिरापर्यंत पोहोचलेला नाही. मंदिरातील अनेक जुन्या वास्तु, भिंती कालानुरुप जीर्ण होत असून, यांची वेळीच दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
सध्या मंदिराच्या व्यवस्थापनासाठी 15 जणांची समिती कार्यरत आहे. अध्यक्षस्थानी नारायण भोगण, उपाध्यक्ष शशिकांत जाधव, सचिव बसवराज पुजारी, खजिनदार बाळाराम करडे, सदस्य दशरथ भोगण, वैजनाथ केसरकर, अमृत भोगण, आप्पाजी आडाव, शंकर गुंडप, अरुण कांबळे, दशरथ कांबळे, पुजारी- शिवकुमार शंकर पुजारी, भटजी – प्रमोद बर्वे यासह इतर सेवा बजावत आहेत.
वैद्यनाथांचा झाला वैजनाथ
वनवासातून लंकाधीश रावण यांनी सीतेला पळवून आणले, त्यामुळे राम व रावण यांच्यात मोठे युद्ध झाले. या युद्धात लक्ष्मणाला पशुपतीस्त्र अस्त्र लागून ते मुर्च्छीत पडले. लक्ष्मणावर उपचार करण्यासाठी संजीवनी वनस्पती गरजेची होती. द्रोणागिरी पर्वतावरील संजीवनी आणण्यासाठी पवनपुत्र हनुमान निघाला. परंतु हनुमानाला औषधी वनस्पती विस्मरण झाल्याने त्याने संपूर्ण डोंगरच उचलला. वाटेमध्ये द्रोणागिरी पर्वताचा लहानसा तुकडा तुटून खाली पडला. तोच हा तुकडा म्हणजे वैद्यनाथ डोंगर. या परिसरात अनेक औषधी वनस्पती असल्यामुळे तेव्हाचे भाविक वैद्यनाथ असे म्हणत. कालांतराने अपभ्रंश होऊन वैद्यनाथाचा वैजनाथ असा बदल झाला.
निलजी ब्र्हमलिंग देवाचा महिमा सर्वदूर
युवराज पाटील /सांबरा
बेळगावच्या पूर्व भागातील निलजी गावात श्रावण सोमवार मोठय़ा भक्तिभावाने साजरा केला जातो. पूर्वापार स्थापन केलेल्या मंदिरात प्रत्येक सोमवारी अभिषेक व महापूजा करून ब्रह्मलिंगाची पूजा केली जाते. दर सोमवारी मंदिर परिसरात पालखी सेवा करण्यात येते. श्री ब्रह्मलिंग देवाचा महिमा सर्वदूर पसरला असून जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
प्रारंभी सन 1918 मध्ये हे मंदिर बांधण्यात आले. 1922 मध्ये मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. अलीकडे मंदिराचे विस्तारीकरण करून भव्य मंदिर बांधण्यात आले आहे. 12 डिसेंबर 2012 रोजी या मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर मंदिराचा नावलौकिक वाढला असून पंचक्रोशीतील नागरिकांची या मंदिराकडे ओढ लागली आहे. दक्षिण भारतात यावषी 29 जुलैपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. या काळातील प्रत्येक सोमवार महत्त्वपूर्ण समजला जातो. श्रावण महिन्यात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती. त्यामुळे हा महिना महादेवाला अतिशय प्रिय आहे, अशी मान्यता आहे. श्रावणातील सोमवारी महादेवाची आणि देवी पार्वतीची पूजा केल्याने आर्थिक समस्या दूर होतात, स्त्रियांना सौभाग्य प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. निलजीतील ब्रह्मलिंग मंदिर हे शिव मंदिर समजले जाते. या ठिकाणी शेवटच्या श्रावण सोमवारी पूजा करून महाप्रसादाचे आयोजन केले जाते. याला ’परव’ (धार्मिक पर्व) या नावाने संबोधले जाते. कोरोना कालावधीत गेली काही वर्षे हा धार्मिक सण अतिशय साध्या पद्धतीने साजरा झाला होता. यावषी मोठय़ा भक्तिभावाने निलजी गावचा धार्मिक सण मोठय़ा प्रमाणात साजरा केला जाणार आहे, अशी माहिती देवस्की पंच कमिटीने दिली.
येथे नवरात्र उत्सव दरवषी मोठय़ा भक्तिभावाने साजरा केला जातो. नऊ दिवस पूजा करून गावातील भाविक मंदिर परिसरात वास्तव्य करून असतात. या कालावधीत केवळ फलाहार आणि दुधाचे सेवन केले जाते. नवरात्र उत्सव मंडळद्वारा या नऊ दिवसांच्या कालावधीत कीर्तन, प्रवचन व वाचन केले जाते. दीपावलीत मंदिर परिसरात लक्ष दीपोत्सवद्वारे मंदिर प्रकाशमान केले जाते. जानेवारी महिन्यात यल्लम्मा यात्रेहून आलेले सर्व भाविक ब्रह्मलिंग मंदिर परिसरात वास्तव्य करून राहतात. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात यात्रा भरते. चैत्र महिन्यात ब्रह्मलिंग मंदिर परिसरात यात्रा भरते. यावेळी आंबिल गाडय़ांचे आयोजन केले जाते. विशिष्ट प्रकारची रंगरंगोटी करून गाडय़ांची गावातून मिरवणूक काढून मंदिर परिसरात सांगता केली जाते. याशिवाय वर्षभर दर सोमवारी मंदिरात दुग्धाभिषेक व पूजा केली जाते. सायंकाळी पालखी उत्सव होतो. या उत्सवात गावातील अनेक भाविक सहभागी होत असतात.
आम्ही दररोज मंदिरामध्ये पूजा करतो. दर सोमवारी व अमावास्येला विशेष पूजा होते. दर सोमवारी सायंकाळी पालखी सेवा करण्यात येते. श्रावण, दसरा, दिवाळी व चैत्र महिन्यात यात्रेला भाविकांची विशेष गर्दी असते. सध्या आमची चौथी पिढी मंदिराचे पुजारी म्हणून कार्य करत आहे.
– अर्जुन पुजारी, मंदिराचे पुजारी
या मंदिराचा जीर्णोद्धार सन 1918 मध्ये तर 1922 मध्ये उद्घाटन झाले होते. त्यानंतर पुन्हा मंदिर जीर्णोद्धाराचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जीर्णोद्धार करून 12 डिसेंबर 2012 रोजी उद्घाटन करण्यात आले. मंदिरात श्रावण महिन्यातील पूजा व पालखी सेवेला विशेष महत्त्व आहे.
– गंगाराम मोदगेकर
येथील श्री ब्रह्मलिंगाचे मंदिर पुरातन असून वर्षभर विविध कार्यक्रम होतात. नवरात्र उत्सवात अनेक भाविक उपवास करून मंदिरातच वास्तव्याला असतात. भजन-कीर्तन आदी सेवा येथे केली जाते.
– गोविंद पाटील
देवस्की पंच कमिटी व श्रीराम मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या मंदिराला कर्नाटक व महाराष्ट्रातील आजी-माजी मंत्र्यांनी भेट दिली आहे. पंढरपूर येथे साडेपाच गुंठे जागेत भक्तांच्या सोयीसाठी भव्य भक्तनिवास उभारले आहे. भक्तनिवासच्या सभामंडप व कार्यालयाचे अलीकडेच उद्घाटन केले आहे. दरवषी गावातून निलजी-पंढरपूर पायी दिंडी काढण्यात येते.
– सुनील पाटील