अध्याय तिसावा
नाथ महाराज पुढे सांगतात, श्रीकृष्णनाथ निजधामाला जाण्यासाठी अश्वत्थ वृक्षाखाली वीरासन घालून बसले. सर्व स्त्राrपुरुषांचे लक्ष श्रीकृष्णाच्या मोहक मूर्तीकडेच लागले होते. अर्थात ह्यात काहीच नवल नाही. विशेष म्हणजे त्यांच्या रुपाकडे पाहून संन्यासीही भुलले आणि वेडे झाले. महादेवांनी जेव्हा तेजस्वी कृष्णमूर्ती बघितली तेव्हा शिवांना त्याचेच ध्यान लागले आणि त्यांनी स्वत:चे मन आपणहून कृष्णार्पण केले.
सर्वसंगपरित्यागी, स्मशानात राहणाऱ्या, वैराग्यपूर्ण महादेवांना कृष्णमूर्तीची भुरळ पडावी इतकी श्रीकृष्णांची काया मोहक दिसत होती आणि त्यावर त्यांच्या हास्य वदनाने कडी केली होती. त्यांचे डोळे कमळासारखे सुंदर दिसत होते. डोक्यावरच्या केसात सुगंधी फुलांच्या माळा गुंफल्या होत्या. त्यांच्या कानात मकराकार कुंडले होती. त्यांचे वर्णन ऐकणाऱ्याचे राग, लोभ, इच्छा, द्वेष, सुख, दु:ख आदि विकार मात्र मावळून जातात. अशी ती दैदिप्यमान होती. कमरेवर विराजमान झालेले पितांबर आणि प्रावरण म्हणून खांद्यावर घेतलेले दुसरे पितांबर दोन्हीही तापवलेल्या सोन्यासारखेच पिवळे धमक दिसत होते. भगवंतांनी डाव्या भागावर भृगु ऋषींनी मारलेली लाथ धारण केली होती. त्यांच्यावर भक्त करत असलेल्या आत्यंतिक प्रेमाचे ते प्रतिक होते.
कृष्णमूर्तीच्या गळ्यात कौस्तुभ मण्यांची माळ गळ्यात रुळत होती. कमरेवर रत्नमेखला मिरवत होती. गळ्यात जानवे शोभून दिसत होते आणि पायापर्यंत वनमाळा शोभून दिसत होत्या. माथ्यावर लखलखीत अनर्घ्य रत्ने गुंफलेला मुकुट शोभत होता. बाहुभूषणे आणि वीरकंकणे श्रीकृष्णमूर्तीच्या शोभेत भर घालत होती. वैजयंती आणि पदकाची एकसर माळ गळ्यात होती. नाना रत्नांचे हार मुक्ताफळाची माळ त्याचबरोबर सुगंधित तुळशीमाळा गळ्याची शोभा वाढवत होत्या. मोती लावलेले प्रावरणाचे दोन्ही पदर आणि छोट्या घंटा लावलेले रत्नजडित पीतांबर खुलून दिसत असल्याने मनोहर वाटत होते. दंडातल्या वाक्यांचा गजर होत होता तर चरणातल्या नुपूरांचा झणत्कार होत होता. भगवंतांचे चरण कमलदलापेक्षा मऊ होते. अशी श्रीकृष्णमूर्ती संपूर्णपणे शोभायमान दिसत होती. हातात शंख, चक्र, गदा, कमळ अशी आयुधे घेऊन, वीरासन घालून भगवंत बसले होते. वीरासनात उजवा पाय जमिनीवर टेकला होता तर डावा पाय उजव्या पायावर ठेवला होता. मावळत्या सूर्याला लाज वाटेल अशी भगवंतांची दैदिप्यमान चरणशोभा दिसत होती. स्वत:च्या कुलाची होळी करून सरस्वतीच्या किनारी वनमाळी पिंपळाच्या झाडाखाली बसला होता. श्रीकृष्णाचे लालसर चरण बघून जराव्याधाला ते हरणाचे तोंड वाटले. त्याने धनुष्याला प्रत्यंचा लावून बाण मारला. सांबाला गरोदर स्त्राrचे रूप देऊन मुनींच्या पुढे उभे करून हिला काय होईल असे विचारले असता त्यांनी यादवांचा कावेबाजपणा ओळखला असल्याने हिला मुसळ होईल आणि ते सर्व यादवकुलाचा नाश करेल असा शाप दिला होता. म्हणून यादवांनी घाबरून जाऊन त्या मुसळाचे चूर्ण करून समुद्रात टाकले होते. त्यांना वाटले आता ब्राह्मणांचा शाप बाधणार नाही परंतु ते चूर्ण समुद्रात रुजले आणि त्याला भाल्यासारखे कडक गवत फुटून यादवांनी त्या भाल्यानीच एकमेकांना ठार मारले. त्या मुसळाचा लोखंडाच्या कड्याचा तुकडा समुद्रातील माशाने गिळला आणि नेमका तोच मासा जराव्याधाने समुद्रात फेकलेल्या जाळ्यात सापडला. व्याधाने तो मासा चिरताच तो लोखंडाचा तुकडा त्याला दिसला. त्या लोखंडाच्या तुकड्याचा त्या व्याधाने बाण बनवला आणि त्या बाणानेच त्याने श्रीकृष्णाच्या तळपायाचा वेध घेतला. अशा पद्धतीने भगवंतांनी अवतार घेताना यादव वंशाची निवड केलेली असल्याने त्यांनाही ब्रह्मशाप भोवला.
क्रमश: